वैदू समाज जातपंचायतीचा जाच सुरूच, नवविवाहितेला चारित्र्यहीन ठरवत दिला घटस्फोट

वैदू जातपंयाचतीचा जाच आजही सुरूच असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघड झाला आहे. आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांचा स्पेशल रिपोर्ट....

Update: 2021-03-28 14:10 GMT

काही वर्षांपूर्वी पुरोगामित्वाचे ढोल बडवत वैदू समाजातील जातपंचायत बरखास्त करण्याची घोषणा करण्यात आली. आता वैदू समाज आधुनिकतेच्या मुख्य प्रवाहात येईल असाही दावा करण्यात आला. पण गेल्या काही दिवसात मॅक्स महाराष्ट्रने शोधून काढलेल्या घटनांवरुन वैदू समाजातील जातपंचायत अजूनही जिवंत असल्याचे दाखले मिळत आहे. राज्य सरकारने केलेल्या जातपंचायतविरोधी कायद्याला ठेंगा दाखवत इथे आजही पंचायत भरवली जात आहे आणि अजब फतवे काढून लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे.

महाराष्ट्रात जात पंचायत भरवण्यास कायद्याने बंदी असून तो एक दखलपात्र गुन्हा आहे, असे असले तर भटके विमुक्त जातीतील अज्ञान, शिक्षणाचा अभाव आणि असुरक्षितता याचा फायदा घेऊन आजही वैदू समाजात जातपंचायत सुरू असल्याचा प्रकार कल्याण, विठ्ठलवाडी येथील वैदू वस्तीत हा प्रकार समोर आला आहे. 13 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मुक्ता नावाची तरुणी लग्नानिमित्त विठ्ठलवाडी येथे आली असता, वैदू समाजातील पंच स्वामी वैदू याने जातपंचायत भरवून माझा व माझ्या नवऱ्याचा घटस्फोट केला आणि माझ्या आई वडिलांच्या वर साडे तीन लाखांचा दंड ठोकला, असा आरोप केला आहे. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लक्ष्मण शिर्के आणि त्यांची आई यांनी येथे पंचायत भरली असा दुजोरा दिला आहे.

Full View

याप्रकरणाची पोलीस स्टेशनने केवळ किरकोळ नोंद घेतली आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एड. तृप्ती पाटील यांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पण हा सर्व ब्लॅक मेलिंग आणि समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न असून समाजात कुठेही जातपंचायत होत नाही, कौटुंबिक वादात जर कुटुंबात सल्ला विचारला तर चर्चा होते, ऐकले तर ठीक नाही तर त्यांना पोलीस आणि कोर्टात जा असे सांगतो. आमचा पारंपारिक वैदूचा व्यवसाय असून आम्ही जडी बुटीची औषधे देतो, असे स्पष्टीकरण स्वामी वैदू यांनी दिले आहे.

वैदू समाजात नव्याने शिकलेली मुले आणि जुनी पिढी यात संघर्ष सुरू असून आपले सामाजिक वर्चस्व टिकवण्यासाठी जुन्या पंच लोकांचा सारा खटाटोप सुरू आहे, असे मत काही तज्ज्ञ व्यक्त करतात.

Tags:    

Similar News