कर्जाला कंटाळून बीडच्या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं

Update: 2023-03-09 13:21 GMT

बीड जिल्ह्यातील बोरखेड येथील शेतकरी संभाजी अष्टेकर रात्री शेतात पाणी द्यायला गेले. ते पुन्हा परतलेच नाहीत. कुटुंबाने शोधाशोध केली. सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला लटकलेला आढळला. कुटुंबाची जबाबदारी, अंगावर झालेले कर्ज आणि शेती उत्पादनाचा पडलेला भाव यामुळे गेले काही दिवस ते तणावात होते.

बीड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. संभाजी अष्टेकर हे घरातील एकमेव कर्ते असल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे . त्यांच्या पश्चात वयस्कर आई वडील बहिण तसेच दोन लहान मुले आहेत. बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या आत्महत्या नसून सरकारी व्यवस्थेने केलेले खून असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली आहे..

बीड जिल्ह्यातील ही घटना एकमेव नाही गेल्या दोन महिन्यात तब्बल 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सरकारी आकडेवारीतूनच स्पष्ट झाले आहे. शेतीच्या खर्चाकरिता शेतकरी बँका तसेच इतर खासगी कर्ज उचलतात. अनेकदा अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे शेतीत उत्पन्न मिळत नाही. उत्पन्न मिळाले तर त्याला योग्य भाव मिळत नाही. अशा स्थितीत घेतलेले कर्ज फेडायचे कसे? कुटुंब चालवायचे कसे? या आर्थिक विवंचनेत शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलत आहेत.

मागील २०२२ या वर्षी सुमारे २७० शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले होते यामधील जवळपास २१६ प्रकारने मदतीसाठी पात्र ठरली असून 47 आत्महत्या अपात्र ठरलेल्या आहेत. तर सत प्रकरणांची चौकशीच प्रलंबित आहे. २०२३ या वर्षी ५० शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची ही आकडेवारी चिंता वाढवणारी असून हे थांबवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.


Tags:    

Similar News