मुंबईत रेल्वेचे रूळ ओलांडतांना होणाऱ्या अपघातांबाबत काँग्रेसचे लातूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अमित देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी एक अजब उत्तर दिलंय.
मुंबईत मागील ३३ महिन्यात झालेल्या रेल्वे रूळ ओलांडतांना होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ होत असून याबाबत राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्या असा प्रश्न आमदार देशमुख यांनी अतारांकित प्रश्नाद्वारे विचारला होता. त्यावर उत्तर देतांना परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी मागील ३३ महिन्यात अशा अपघातांमध्ये ४ हजार ४७२ जणांचा मृत्यु झाला असल्याचं सांगितलं. रेल्वे रूळ ओलांडणे कायद्यानं गुन्हा असूनही त्याचं प्रमाण कमी का होत नाही, यामागील कारणं काय आहेत असा थेट प्रश्न विचारला होता.
त्यावर परिवहन मंत्री रावतेंनी, रेल्वे रूळ ओलांडणे कायद्यानं गुन्हा आहे हे माहिती असूनही त्यांच्या (प्रवाशांच्या) अतिसुविधा घेण्याच्या प्रवृत्तीमुळं असे अपघात होत आहेत, असं अजब उत्तर दिलंय. असे अपघात होऊ नये म्हणून नियमितपणे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते, काही ठिकाणी कुंपण भिंती घालण्यात आल्या आहेत, अपघातानंतर ब्लॅक स्पॉटस् शोधून अशा ठिकाणी रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहेत, सरकते जिने आणि लिफ्टस् बसवण्यात येत असल्याचं लेखी उत्तर रावतेंनी दिलंय.