Special Report : महाराष्ट्रात काय होणार, नवे समीकरण की मध्यावधी निवडणुका?

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ED ने कारवाई केल्यानंतर सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण सरकार खरंच पडणार का, मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे का किंवा नवीन समीकरण उदयास येऊ शकते का, यासर्व शक्यता पडताळारा स्पेशल रिपोर्ट

Update: 2022-03-24 14:35 GMT

महाराष्ट्रात पुढील काळात काय होणार? मध्यावधी निवडणुका की सरकार पडून नवी युती आघाडी ? किंवा भाजप २०२४ पर्यंत वाट पाहणार ? की भाजप राजकीयदृष्ट्या अस्पृश्य होणार?

असे अनेक प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा केला, त्यानंतर संतापलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुकंले....या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना तुरुंगात टाकले. आता तर या यंत्रणा राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या मातोश्री अर्थात ठाकरे कुटुंबाच्या दारापर्यंत पोहोचल्या आहेत. पण यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. "सरकार अस्थिर आहे, असे केवळ भाजप म्हणत आहे, त्यात काही तथ्य नाही" अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडली.

एकीकडे EDने थेट ठाकरेंच्या घरात हात घातला असताना मुख्यमंत्र्य़ांनी मात्र या सर्व संकटाला तोंड देण्याचा निर्धार केला आणि आपण संघर्षाच्या भूमिकेत असल्य़ाचा इशारा भाजपला दिला आहे. संजय राऊत यांना वारंवार तसे इशारे दिले आहेत. नुकतेच त्य़ांनी नागपुरात जाऊनही पुढची रणनीती काय असेल याचे संकेत दिले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असा दावा सत्ताधारी करत आहेत. पण भाजप नेते मात्र वेगळाच दावा करत आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणतात की, केंद्रीय यंत्रणाचा वापर सूडबुद्धीने होत असेल तर कोर्टात का जात नाहीत. त्याचबरोबर मध्यावधी निवडणुकांची शक्यता त्यांनी फेटाळली आहे. पण सरकार अंतर्गत कलहामुळे सरकार पडले तर भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला.

डर के आगे जीत है...असे म्हणतात...याप्रमाणे आता भाजपच्या दबावतंत्राला जुमानायचे नाही, असा निर्धार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. पण त्याचवेळी केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांविरोधात बेकायदेशीरपणे विरोधही करायचा नाही, अशी संयमाची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न भाजपने केला तर त्यालाही शह देण्याची तयारी दिसते आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची वाट पाहणाऱ्या भाजपला राजकीयदृष्ट्या एकटं पाडले तर संपूर्ण डाव भाजपवरच उलटेल असे दिसते आहे.


Full View

Tags:    

Similar News