Exclusive Gorund Report : बोगस बियाणं पुन्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

एकीकडे लॉकडाऊन, अवकाळी पाऊस यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी या हंगामात पुन्हा कंबर कसली....पण बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. पाहा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा Exclusive Gorund Report

Update: 2021-06-24 15:22 GMT

खरिप हंगाम सुरू झाला तशा शेतकऱ्यांनी पेरण्याही उत्साहात केल्या. यंदाही मात्र खराब बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं हंगामच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी सोयाबीनची बियाणं बोगस निघाली होती तर यंदा कापसाचे बियाणे खराब निघालाचा प्रकार समोर आला आहे.


कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात पेरण्यांच्या काळात अनेक कंपन्यांची बियाणं बाजारात आली आहेत. मात्र काही कंपन्यांचे बियाणे खराब असल्याच्या तक्रारीहीसुद्धा यायला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिंदाड या गावाच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस बियाणे घेतले. मात्र या बियाणांची उगवण क्षमता पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील अशोक गिरीधर चौधरी तसेच आसपासच्या शेतकऱ्यांनी प्रभात सीडस कंपनीचे वाण PCH-15 B2 सुपर कॉटन लावले. मात्र त्याची उगवण 50 टक्केच झाली, तर 50 टक्के पीक खराब झाले. विशेष म्हणजे या बियाणांच पाकीट उघडल्यानंतर बियाण्याला कीड लागली होती, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच पाकिटातील अनेक सिड्स खराब आढळून आल्याचं शेतकऱ्यांच म्हणणं आहे , बियाणं कंपनीला कळवूनही आजपर्यंत दखल घेतली नसल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.



कोरोनामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यातही शेतकरी सज्ज असतांना खराब बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे . गेल्या वर्षी सोयाबीनचे बियाणं बोगस निघाले होते. या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरण्या करण्याची वेळ आली होती. बोगस सोयाबीन बियाणं कंपन्यांना भरपाई देण्याचे आदेश असतांनाही अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.


कोणत्याच सरकारचा धाक आता बियाणं कंपन्यांवर राहिला नाही, हे गेल्या काही वर्षांपासून दिसून आलं आहे. 'शुद्ध बियाणं द्या' ही माफक अपेक्षा शेतकऱ्यांची असते मात्र ती सुद्धा कंपन्या करू शकत नाही. बियाणं कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. सरकारमधील बडे अधिकारी आणि नेते काही कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही होतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोगस बियाणं कंपन्यांना काळ्या यादीत टाकलं तरच ह्या कंपन्यांना चाप बसेल.

Delete Edit


दरम्यान यासदंर्भात आम्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांना संपर्क साधला तेव्हा शेतकऱ्यांनी खराब बियाणे निघाले तर तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, शिंदाड परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारची गंभीर दखल घेऊन पंचनामा करण्यात येईल. खराब बियाणे असतील तर बियाणे कंपनी विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल असे सांगितले आहे.

Full View

Tags:    

Similar News