मुंबई महापालिकेतील पालकमंत्री लोढांचं कार्यालयं २४ तासात रिकामं करा, आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

Update: 2023-07-21 11:54 GMT

मुंबई महापालिकेत मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं कार्यालय सुरू कऱण्यात आलंय. त्याला शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेत थेट लोढा यांना २४ तासात कार्यालय रिकामं करण्याचा इशाराच दिलाय.

मंगलप्रभात लोढा हे मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांना महापालिकेत कार्यालय कशासाठी देण्यात आले ? त्यांचा महापालिकेशी काय संबंध ? लोढांनी तात्काळ आपलं कार्यालय खाली करावं. येत्या २४ तासात लोढांनी महापालिकेतील कार्यालय रिकामं न केल्यास मुंबईकर त्यांचा राग दाखवतील, असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी थेट लोढांनाच दिलाय.

मंत्री असतांना आम्ही महापालिकेत अनेक बैठका घेतल्या. मात्र, अशापद्धतीनं कुठेही असं दालन हडपलं नाही. हे थांबलं पाहिजे, बदललं पाहिजे. अन्यथा मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौरांना दालनं दिलं पाहिजे, त्याचबरोबर मुंबईचे आमदार म्हणून आम्हांलाही महापालिकेत कॅबिन दिलं पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. मुंबई महापालिकेतील पालकमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये पालकमंत्री बसत नाही तर भाजपचे नगरसेवक बसले होते. नगरसेवकांची कार्यालयं बंद करण्यात आली आहेत. त्यात आता हे महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व प्रकार २४ तासात थांबले नाहीत आणि कॅबिन खाली केल्या नाही तर कधी ना कधी मुंबईकर राग व्यक्त करतील, त्याला जबाबदार कोण असेल ? हे माहीत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:    

Similar News