उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा अवघ्या 4 महिन्यात राजीनामा

Update: 2021-07-03 01:33 GMT

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात तीरथ सिंग रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे त्यांनी शुक्रवारी रात्री अकरा वाजता राजीनामा सोपवला. घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे रावत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्व आणि पंतप्रधान मोदींनी दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानले. रावत हे गेले दोन ते तीन दिवस दिल्ली मुक्कामी होते. या काळात त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, अमित शाह यांची भेट घेतली होती. शुक्रवारी देखील ते दिल्लीत होते. त्यानंतर रात्री देहरादून येथे परतल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

रावत हे गडवालचे खासदार आहेत. पण 10 मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत त्यांना सभागृहात आमदार म्हणून निवडून येणे बंधनकारक आहे. पण राज्यात कोरोनाच्या संकटामुळे पोटनिवडणुकीबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो म्हणून आपण राजीनामा दिल्याचे कारण रावत यांनी सांगितले आहे.

आता नवीन मुख्यमंत्र्यांची निवड शनिवारी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी तीन वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदी नवीन व्यक्तीची निवड केली जाणार आहे. त्याआधी रावत हे शुक्रवारी दिवसभर दिल्लीत होते. दिल्लीमध्ये त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला.

दरम्यान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश सिंग रावत यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. कोरोनामुळे पोटनिवडणूक शक्य नाही म्हणून रावत यांना राजीनामा द्यावा लागत आहे, असे कारण दिले जात असले तरी ते साफ खोटे आहे, असा आरोप हरीश रावत यांनी केला आहे. कोरोनाच्या काळातच उत्तराखंडमधील साल्टमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली, याची आठवणही रावत यांनी करुन दिली. तसेच भाजपने गेल्या 5 वर्षात उत्तरांखंडच्या जनतेवर तीन मुख्यमंत्री लादले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

तर उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाधअध्यक्ष प्रीतम सिंग यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने उत्तराखंडला राजकीय प्रयोगशाळा करुन टाकले आहे. राज्यात एकाही मुख्यमंत्र्याला आपला कार्यकाळ पूर्ण करुन दिला जात नाही, त्यामुळे जे काही झाले राज्याचे हिताचे नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Similar News