५० टक्क्यांचा टप्पा ओलांडण्यासाठी नविन पक्षांना मित्र बनवावेच लागेल...देवेंद्र फडणवीस

Update: 2024-04-17 15:59 GMT

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असताना दिसत आहेत. निवडणूकीच्या वेळापत्रकात पहिल्या टप्प्यामध्ये २१ राज्य आणि १०२ मतदारसंघासाठी मतदार होणार असून यामध्ये ५ मतदारसंघ हे महाराष्ट्र राज्यातल्या विदर्भातले आहेत, ज्यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, आणि चंद्रपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. एका बाजूला विदर्भात आपले उमेदवार निवडणूक येण्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या जाहीर प्रचार आणि सभा होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही पक्षांच्या वरिष्ठांकडून विदर्भातल्या मतदारसंघात आम्ही निवडून येऊ असा दावा करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने "अब की बार ४०० पार" असा नारा दिला आहे. असं असलं तरी देवेंद्र फडणवीसांनी मात्र वेगवेगळ्या पक्षांची मैत्री करून आघाडी करणं ही काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे.

मित्र पक्षांमुळे भाजपातील नेते नाराज होत आहेत का? यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

महायुती आता अनेक पक्ष एकत्र येत आहेत. याची सुरूवात एकनाथ शिंदे यांच्यापासून झाली. यामध्ये नंतर अजित पवारांची भर पडली. आता राज ठाकरे यांनीही बिनशर्त पाठिंबा देऊन एकप्रकारे नरेंद्र मोदी यांचं समर्थन केलं आहे. यामुळे अनेक भाजपा नेत्यांच्या संधी विभागल्याबाबत भाजपातील नेत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत, यावर आपली भूमिका काय? असा प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

“कुणालाही महत्त्वाकांक्षा असणं यात गैर काहीही नाही. पण आता सत्तेचा मार्ग आघाड्यांच्याच मदतीने पार होऊ शकेल, या राजकीय वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घ्यायला हवं. आघाड्या या निवडणूक राजकारणाची गरज असतात. प्रत्येकानं या सत्याचा स्वीकार करायला हवा. महाराष्ट्रात भाजपाकडे सुरुवातीला १६ टक्के मतांचा हिस्सा होता. तो वाढून २८ टक्के झाला. आता तो ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जर आम्हाला ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडायचा असेल, तर नवीन मित्र बनवावेच लागतील. त्यासाठी तडजोडी करणं ही काळाची गरज आहे” अशी भुमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

Tags:    

Similar News