“माफ करा, मुनीश्री, आपण चुकलात!” - ‘ताराबाई जैन होत्या’ विधानावर राजेंद्र दर्डा यांची ठाम भूमिका

Update: 2026-04-03 11:50 GMT

Maharani Tarabai controversy  नुकत्याच झालेल्या भगवान महावीर जयंती महोत्सवात जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी मुंबईत एका कार्यक्रमात म्हटले होते की, महाराणी ताराबाई जैन धर्मीय होत्या. त्यासोबत त्यांनी मराठी भाषा जैन परंपरेतून आली असल्याचा दावाही केला होता. या विधानाने महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. खरंतर महाराणी ताराबाईंची ओळख मुख्यतः मराठा योद्धा आणि स्वराज्यरक्षिका अशी आहे. मुनींच्या या विधानासंदर्भात सोशल मीडियावर अनेकांनी आपली मत व्यक्त केली. मराठा समाज, इतिहासकार आणि राजकीय नेत्यांनी याला इतिहासाची तोडफोड आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावणारे म्हटले. एकंदरित महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने समोर आला असून सामाजिक आरोग्य संतुलित राहावे यासाठी खुद्द जैन धर्मिय अनुयायी आणि पेशाने पत्रकार असलेल्या लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वादग्रस्त विधानावर आपली रोखठोक भूमिका मांडली. त्यांनी मुनींना जैन धर्मातील तत्वांची उजळणी आणि सल्ला देणारा एक लेख लोकमतमध्ये लिहीला आहे. 

राजेंद्र दर्डा काय म्हणाले?

राजेंद्र दर्डा यांनी लोकमतमध्ये लेख लिहून मुनींना स्पष्ट सल्ला दिला. त्यांच्या लेखातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे

जैन मुनींचे “महाराणी ताराबाई जैन होत्या” हे विधान धादांत असत्य आहे. हे केवळ चुकीचे नाही, तर इतिहासाची तोडफोड आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारे आहे. महाराणी ताराबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतील शूर वीरांगना होत्या. त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. १७०० नंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले आणि औरंगजेबासारख्या शत्रूला पराभूत केले. त्यांचे कार्य कोणत्याही एका धर्माशी मर्यादित नव्हते. त्यांना मराठा स्वराज्याची रक्षक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्याचे श्रेय कोणत्याही धर्माला देण्याचा प्रयत्न इतिहासाशी अन्याय आहे. इतिहास हा समाजाचा पाया असतो. त्यात फेरफार किंवा विकृतीकरण करणे मान्य करता येणार नाही. महाराष्ट्र ही विचारांची आणि संस्कृतीची भूमी आहे. येथे विविध धर्म, संस्कृती आणि परंपरा एकत्र नांदतात. समाजात सौहार्द आणि परस्पर सन्मान टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शब्दांची जाण ठेवणे आवश्यक आहे. भगवान महावीरांच्या शिकवणीप्रमाणे सत्य, अहिंसा आणि सहअस्तित्व हे मूल्य जपणे गरजेचे आहे. असे विधान जे समाजात फूट पाडते किंवा तणाव निर्माण करते, ते टाळले पाहिजे. जैन समाज हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक आहे. शांतता, सहिष्णुता आणि सत्याचे प्रसार करणारा हा समाज आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तरीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे विधान सर्वांनी टाळले पाहिजे.

आजच्या संवेदनशील काळात जबाबदारीने बोलणे आणि संवाद राखणे अत्यंत आवश्यक आहे. दर्डा यांनी लेखात “माफ करा, मुनीश्री, आपण चुकलात!” अशा शब्दांत मुनींना थेट संबोधित केले असून योग्य इतिहास सांगितला आहे. राजेंद्र दर्डा यांच्या लेखातून त्यांची भूमिका स्पष्ट आणि तत्त्वनिष्ठ आहे. इतिहासाची सत्यता जपणे, समाजात सौहार्द राखणे आणि धर्माच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड न करणे. त्यांनी जैन समाजाचा सन्मान राखतही मुनींच्या विधानाला असत्य आणि भावना दुखावणारे ठरवले आहे.


Tags:    

Similar News