ED चौकशीची मागणी, रोहित पवार यांचा भाजपला टोला

Update: 2021-07-04 07:29 GMT

साखर कारखान्यांच्या प्रकरणात ईडी चौकशीची भाजपची मागणी ही सत्ता मिळवण्यासाठीचा आटापिटा आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.ते कर्जतमध्ये बोलत होते. कर्जत तालुक्यातील थेरवडी या गावात रस्त्याच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. सत्ता मिळवण्यासाठी ईडीचा वापर हा संविधानला धरून नाही भाजपने ED हे राजकीय हत्यार केले आहे, असाही आरोप त्यांनी केला. राज्यातील सर्व साखर कारखान्याची चौकशी करा, आमची तयारी आहे. परंतु ती पारदर्शक चौकशी व्हावी कुठलातरी आकस ठेवून अशा पद्धतीने ED आणि CBIचा वापर करणे हे अतिशय दुर्दैवी आहे. यामुळे चुकीचा पायंडा आणि प्रथा पडतील, अशीही टीका त्यांनी केली.

राज्यातील भाजपा नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांना मराठा आरक्षण व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पत्र लिहिले असते तर ते जास्त योग्य झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे भाजपने केवळ सत्ता द्या मग प्रश्नत सोडवू असे म्हणणे हा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे, अशीही टीका रोहित पवार यांनी केली आहे.

गुजरातला पुरासाठी 1000 कोटी मदत देणारे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे थकवलेले 28 हजार कोटी देण्यास तयार नाहीत. महाराष्ट्राने देखील भाजपचे खासदार निवडून दिले आहेत, याचा विसर मोदींना पडलेला दिसतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Tags:    

Similar News