नवनीत राणांच्या भाषणावरून अतुल लोढेंचा भाजपवर हल्लाबोल...! काय म्हणाले? वाचा

Update: 2024-04-16 13:59 GMT

'अब की बार ४०० पार' असा भारतीय जनता पक्षाने जो नारा दिला आहे, तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी आहे. खरी परिस्थिती अशी आहे की, भाजपचा दारूण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भाजपच्या सर्व उमेदवारांनाही याची जाणीव आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या जाहीर सभेतच, मोदींची हवा नाही, हवेत उडू नका, हे सांगून वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब करत भाजपच्या फुग्यातील हवा काढल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

याविषयी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपच्या उमेदवार आणि अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या प्रचार सभेतच मोदींची हवा नसल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ साली मोदींची हवा असतानाही अमरावतीतून अपक्ष म्हणून निवडून आले, मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका असे बजावले आहे. नवनीत राणा यांना वस्तुस्थिती समजली आहे परंतु देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र हे समजले नाही. ते अजूनही हवेतच आहेत. मोदींचे नाणेच खणखणीत आहे. यावर या दोन नेत्यांचा अद्याप विश्वास नाही. २००४ साली सुध्दा 'इंडिया शायनिंग' आणि 'फिलगुड' च्या हवेत असलेल्या व अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींच्या सत्तेला सोनियाजी गांधी यांनी सुरूंग लावून सत्तेतून बाहेर कसे केले हे भाजपाला कळले नाही.

प्रतिवर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमी भाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देणार, 2 कोटी नोकऱ्या देणार,अशी आश्वासने 2014 साली मोदींनी दिली होती, ती पूर्ण केलेली नाहीत, याचा जनतेत प्रचंड राग आहे. सुधीर मुनगंटीवार, अनुज धोत्रे या भाजपा उमेदवारांना जनतेने जाब विचारला. मागील 10 वर्षात काय केले असे प्रश्न जनता विचारत आहे. अनेक गावात भाजपाचे उमेदवार व नेत्यांना हाकलून दिले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. मोदींची गॅरंटी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन सारखीच फसवी आहे. ते जरी पुन्हा आले तरी त्यांचा राजकीय आलेख घसरला आहे, एकनाथ शिंदेंच्या हाताखाली त्यांना काम करावे लागत आहे, असे लोंढे म्हणाले.

Tags:    

Similar News