ही तर कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा ! - जयंत पाटील

Update: 2021-04-01 08:47 GMT

भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

केंद्रसरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात मागे घेत यु-टर्न घेऊन सारवासारव केली आहे. यावर जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याज वार्षिक ४ वरून ३.५ टक्के केले आहे. एक वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज ७.४ वरून ६.५ टक्के केले आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के करण्यात आले. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी केले आहेत.

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) हे नवे व्याजदर लागू राहतील. मात्र नजरचुकीने झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

दरम्यान भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्रसरकारने थट्टा केली आहे असा थेट आरोपही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

Tags:    

Similar News