शून्य टक्के व्याजदराची पीककर्ज योजना संपुष्टात आणण्याचा राज्य सरकारचा डाव

Update: 2023-10-02 13:19 GMT

शून्य टक्के व्याजदराच्या पीककर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर मुद्दल व ६ टक्के दराने व्याजाचा भरणा करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अन्याय्य असून, यामागे योजनाच संपुष्टात आणण्याचा डाव आहे अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

शून्य टक्के व्याजदर पीककर्ज योजनेत संदर्भात राज्य सरकारने केलेल्या बदलांवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना चव्हाण म्हणाले की, सदर योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना यापूर्वी पीककर्जाचा भरणा करताना व्याज देणे अनिवार्य नव्हते. केवळ मुद्दल भरून शेतकरी नव्या कर्जाची उचल करत होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता पीककर्जाच्या मुद्दलासमवेत ६ टक्के दराने व्याजही भरावे लागणार आहे. सव्याज कर्ज फेडले तरच शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल, असा हट्ट राज्य सरकारने धरला आहे.

सद्यस्थितीत सततची नैसर्गिक संकटे आणि शेतमालाच्या घसरत्या किंमतींमुळे शेतकऱ्यांना मूळ मुद्दल भरणेही अशक्य झालेले असताना राज्य सरकारने हा जुलमी निर्णय घेतला आहे. ६ टक्के दराने व्याज भरण्याची सक्ती शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. सवंग लोकप्रियतेसाठी एकिकडे शेतकऱ्यांना २ हजार रूपये देणारी योजना जाहीर करायची आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या अटी-शर्ती कठोर करून भविष्यात त्या योजना बंदच करायच्या, असा हा डाव असल्याचा संशयही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

Tags:    

Similar News