#FarmersProtests : ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीच्या सीमेवर शेतकरी परतणार

Update: 2021-12-09 10:24 GMT

दिल्लीमध्ये गेले वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर आता आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरुन परतण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त किसान मोर्चाने आता ११ डिसेंबरला परतणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतरही शेतकरी दिल्लीच्या सीमेवरुन हटण्यास तयार नव्हते. इतर मागण्यांबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली होती.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना पाठवलेला प्रस्ताव इथल्य़ा आंदोलक शेतकरी संघटनांनी स्वीकारला आहे. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर सर्वांचे एकमत असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. मोठा विजय मिळवून घरी परत जात असल्याचे किसान मोर्चाने यावेळी सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात परतणार आहेत. दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर गेल्या ३७८ दिवसांपासून ठाण मांडून बसलेले शेतकरी ११ डिसेंबरला आपापल्य़ा राज्यांमध्ये परतणार आहेत.

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी पंजाबमधील विविध जिल्ह्यांमध्ये निघालेल्या पदयात्रा देखील आता १५ डिसेंबरपासून थांबवण्यात येणार आहेत. पण १५ डिसेंबरला शेतकऱ्यांची एक बैठक घेतली जाणार असून पुढील दिशा देखील ठरवली जाणार असल्याचे यावेळी शेतकरी नेत्यांनी सांगितले.

Similar News