द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या कंगनावर महाराष्ट्र सरकार कारवाई का करत नाही? – एड. असीम सरोदे

कंगना राणावत सारखी अभिनेत्री वारंवार वादग्रस्त आणि बेकायदेशीर वक्तव्य करत असते, पण तिच्याविरुद्ध राज्य सरकार कारवाई का करत नाही, असा थेट सवाल उपस्थित केला आहे, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी...

Update: 2021-11-26 12:34 GMT

कंगना राणावत सारखी अभिनेत्री वारंवार वादग्रस्त आणि बेकायदेशीर वक्तव्य करत असते, पण तिच्याविरुद्ध राज्य सरकार कारवाई का करत नाही, असा थेट सवाल कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलेल्या पोस्टमधून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहे. त्यांनी नेमके काय म्हटले आहे ते पाहूया...

कंगना राणावत या 'उद्धटपणा-धीट' अभिनेत्रीच्या बेताल, बेकायदेशीर, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व बेकायदेशीर कृत्य ठरेल अशा वक्तव्यांच्या विरोधात मी अनेकांना तक्रारी लिहून दिल्यात. त्यांनी तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या, त्याच्या बातम्या झाल्यात पण हे प्रकरण शेवटापर्यंत न्यावे असे वाटणारे दुर्मिळ आहेत.

कंगनाच्या अशाच द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणी दिल्ली विधानसभेच्या ' शांतता व सलोखा समितीने' अभिनेत्री कंगना हिला सहा डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याला म्हणतात धडक कारवाई व संविधानिक कार्यवाही.

महाराष्ट्रातील सरकार कधी व कोणत्या मुद्यांवर अशी घटनात्मक कार्यवाही करतांना व निडर भूमिका घेतांना दिसले का? महाराष्ट्र विधानसभेत अशी ' शांतता व सलोखा समिती ' तरी आहे का? या देशात वाजवी बंधने न पळता काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे असा स्वयंस्वीकृत समज बाळगणाऱ्या झुंडींना संविधानाचे अस्तित्व व प्रखरता जाणवली पाहिजे याची गरज आहे. संविधान दिवस केवळ विशिष्ट समाजाच्या लोकांनी साजरा करायचा हा प्रकार बंद झाला पाहिजे.

संविधान दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा !!

© अ‍ॅड असीम सरोदे

Tags:    

Similar News