अर्णब, कंगना आणि आपण

Update: 2020-09-25 05:58 GMT

आज मुंबईत रिपब्लिकच्या पत्रकाराची आणि इतर माध्यमांच्या पत्रकारांची बाचाबाची झाली. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हे अकस्मात घडलेलं नाही. खरंतर अपेक्षितच होतं. बहुतेक याची सुरुवात कमलेश सुतार यांनी कंगनाच्या ट्विटमधली चूक शोधून काढली. तेव्हापासून झाली. कंगनाने दिलेली धमकी पोकळ निघाली. कारण सुतार यांची माहिती अचूक होती.

त्यामुळे कंगनाला ट्विट डिलीट करावं लागलं. साहजिकच माध्यम प्रतिनिधींना व्यक्त होण्याचं ठोस कारण मिळालं. याच्या दोन दिवस आधीच उर्मिला मातोंडकर यांची मुलाखत मुंबई तक आणि एबीपी माझाने चालवली होती. (इतरही काही ठिकाणी इंटरव्ह्यू झाले.) त्याला उत्तर म्हणून कंगनाने दिलेल्या मुलाखतीत उर्मिला यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आणि #कंगना विरुद्ध उर्मिला वादाला तोंड फुटलं.

आधी मुंबईबद्दल आक्षेपार्ह भाषेत लिहिणं मग आपलाच अजेंडा रेटून नेणं आणि शेवटी #उर्मिला यांच्यावर घाणेरड्या भाषेत टिप्पणी करणं या कंगनाच्या पराक्रमानंतर मुंबई तकने तसेच इतर मराठी माध्यमांनी (काही इतर भाषेतल्या माध्यमांनीही) उर्मिला यांची थेट बाजू घेतली. हळूहळू मराठीतल्या टीव्ही माध्यमांचा सूर उर्मिला यांच्या बाजूने वळला. मग #हिंदी विरुद्ध #मराठी कलाकार असाही सूर ऐकायला मिळाला.

आजच्या वादानंतर लोकशाही चॅनलने हिंदी विरुद्ध मराठी टीव्ही चॅनल असा सूर या चर्चेला दिलाय. (मराठीतला #अर्णब चांगला जमलाय) माध्यमांबद्दल म्हणावं तर बरंय, किमान अर्णब म्हणजे सगळी #पत्रकारिता असं सरसकट बोलणं कमी होईल. अशी सुरुवात समजुयात. पण त्यासाठी मराठी माध्यमांना कंटेंट तसा देत रहावं लागेल. तरंच अर्णबला प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे.

नाहीतर कंगना, अर्णब हे 'की वर्ड' सध्या चालताय. हिंदी विरुद्ध मराठी ही भावना तीव्र होतेय. आणि सगळ्यांची व्यवहाराची गणित त्याभोवती आखली जात आहेत. लोकहो, भावनेत वाहून जाऊ नका. सारासार विचार करा. योग्य तेच निवडा. मगच मत बनवा. नाहीतर तुमच्या भावनांच्या व्यवहार सुरूच राहील.

(टीप: सरसकट व्हाट्सएपवर काही #फॉरवर्ड करणं टाळा. तुमचे फॉरवर्ड अशा की वर्डला अजून गती देतात आणि भावनेला अजून तीव्र करण्यात मदत करतात.)

Similar News