Ambedkar-Thackeray | आंबेडकर-ठाकरे एकत्र येण्याचा अर्थ काय ?

Update: 2023-01-23 14:33 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन भिन्न विचारांचे राजकीय वारसदार एकत्र आल्यानं संपूर्ण राजकारण ढवळून निघालंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राजकीय युती केलीय. त्यामुळं या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय प्रभाव पडू शकेल, याविषयी निर्माण होणा-या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनाच का निवडली ?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची वैचारिक मैत्री होती. मात्र, राजकीयदृष्ट्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर १९९५ मध्ये स्वबळावर आणि २०१४ मध्ये भाजपसोबत शिवसेनेनं सत्ता (BJP Shiv sena Alliance) स्थापन केली. याव्यतिरिक्त शिवसेना कायमच विरोधी पक्षात राहिली होती. तर दुसरीकडे भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय प्रवास सुरूच ठेवला. मात्र, २०१४ नंतर देशाच्या राजकारणानंच कूस पालटली. या सत्तांतरानंतर काँग्रेससहित विरोधी पक्षांची पीछेहाट सुरू झाली. शेवटी, प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचीच लढाई सुरू झाली. अशा परिस्थितीत २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करून बघितला. मात्र, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता तो इतर ठिकाणी निवडून आणण्याइतपत यशस्वी ठरला नाही. तरीही वंचितला २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ४१ लाख मतं म्हणजेच ३२.४७ टक्के इतकी मतं मिळाली होती. याचाच अर्थ प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत एकूण झालेल्या मतदानापैकी 4.58 टक्के मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळालं.

महाविकास आघाडीत सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना सगळ्यात कमकुवत पक्ष आहे. तर दुसरीकडे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच राजकीय भुमिका घेणं ही प्रकाश आंबेडकर यांच्या दृष्टीनं अपरिहार्यता आहे. त्यातूनच प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंच्या साथीनं ही युती जळवून आणलेली दिसतेय. छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनी आरक्षणासंदर्भात जेव्हा प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. तेव्हाही प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजीराजेंना सांगितलं होतं, "महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो," याचाच अर्थ प्रकाश आंबेडकर हे तेव्हापासूनच नव्या राजकीय मित्राच्या शोधात होते. तो शोध उद्धव ठाकरेंच्या रूपानं सध्या तरी मिटलेला आहे.

भाजप आणि शिंदे गटाचा राजकीय परफॉर्मन्स सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता वंचितनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. वंचितच्या महाविकास आघाडीतील भूमिकेबाबत अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद दिसलेला नाही. त्यामुळं सध्यातरी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना अशी वैयक्तिक युती आहे.

Tags:    

Similar News