राज्यसभा निवडणुकीच्या निकालात अपक्ष आमदारांचा घोडेबाजार झाला, असा आरोप शिवसेनेने केला आहे. महाविकास आघाडीची मतं फुटली नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे. पण आता या निकालावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीचे राज्यसभा निवडणुकीत काहीतरी चुकले याची कबुली दिली आहे. संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत हरले असते, पण नशीब चांगलं म्हणून ते वाचले, या शब्दात भुजबळ यांनी कबुली दिली आहे.
“आम्ही आमच्या लोकांना सगळ्या गोष्टी समजवून सांगितल्या होत्या. आमदारांच्या मीटिंगमध्ये आपण स्वत: सांगितलं होते तसेच अहमद पटेल यांचं उदाहरणही वेळेस दिलं होते. आपला प्रतिनिधी आहे त्याला आपलं मत दाखवायच ते दुसऱ्यांना दिसता कामा नये.” अशी माहितीही भुजबळ यांनी दिली.
यांनी देवेंद्र फडणवीस माणसांना जवळ करण्यात यशस्वी ठरले या शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना भुजबळ म्हणाले की, “ते यशस्वी ठरले आम्ही लोकांना जवळ करण्यात अपयशी ठरलो हे, शरद पवारांना सांगायचं आहे. त्या कौतुकाच्या पाठीमागे त्यांनी आम्हाला काहीतरी शिकवण दिली आहे.”
पण आमदारांच्या नाराजीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावं लागेल, असे म्हटले आहे. “आम्हाला आमचं सरकार असताना 170 च्या ऐवजी 180 वर अशा प्रकारची जुळवणी करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही निश्चित पणे कमी पडलोय,” अशी कबुली त्यांनी दिली आहे. मविआ सरकारच्या आमदारांची नाराजी उफाळून आली होती, ती नाराजी निर्माण होणार नाही याची फार मोठी काळजी आम्हाला घेतली पाहिजे” असे भुजबळ यांनी म्हटले आहे. पण यापुढच्या निवडणुकीमध्ये कितीही केलं तरी भाजपा 120 ते 130 च्या पुढे जात नाही, असा दावाही त्यांनी केला.