शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी केलेल्या एक ट्विटमुळे ते उद्धव ठाकरे गटात परतणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिरसाठ यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असे म्हणत उद्धव ठाकरे यांचे विधानसभेतील एक भाषण ट्विट केले होते. यानंतर त्यांची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली. शिरसाठ यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे शिंदे गटात फूट पडते का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
पण आता या सर्व वादावर स्वत: आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. "आपली ती पोस्ट मार्च महिन्यामध्ये करण्यात आली होती आणि आता माझ्याकडून ती चुकून पोस्ट झाली" अशी सारवासारव त्यांनी केली आहे. तसेच या पोस्टचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असेही त्यांनी म्हटले आहे.