नाशिकमध्ये मनसेचा संघटना बांधणीवर जोर ; जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे

Update: 2021-09-30 02:37 GMT

नाशिक :  नाशिक महापालिका निवडणुक तोंडावर आली आहे याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जिल्हा व शाखाध्यक्षांची खांदेपालट करीत १२२ शाखाध्यक्षांची नियुक्ती केली. या माध्यमातून मनसेने मोठे फेरबदल केल्याचा दावा करण्यात आला. नाशिक महापालिकेत सत्तेत असताना आणि सत्ता गमावल्यानंतर देखील राज ठाकरे यांनी संघटना बांधणीकडे इतके लक्ष दिले नव्हते. मात्र , नाशिकची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांनी संघटनेकडे अधिक गांभीर्याने लक्ष घातले आहे.

नाशिकच्या शाखाध्यक्ष निवडीसाठी अमित ठाकरे यांनी मध्यंतरी मुलाखती घेतल्या होत्या. त्याआधारे राज यांनी यादी जाहीर केली आहे . याच वेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांना शहराध्यक्ष तर शहराध्यक्ष अंकुश पवार यांना जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. या बदलात एकाला बढती देताना दुसऱ्याची पदावनती झाली आहे. शहर समन्वयक या नव्या पदाची निर्मिती करत ते सचिन भोसले यांना देण्यात आले. अ‍ॅड्. रतनकुमार ईचम यांनाही जिल्हाध्यक्ष करण्यात आले. लवकरच पुन्हा नाशिक दौरा करून उपशाखाध्यक्ष व अन्य पदांची नियुक्ती करण्याचे राज यांनी म्हटले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे.

राज्यातील इतर महानगरपालिकांच्या तुलनेत मनसेला नाशिकमधून जास्त अपेक्षा आहेत. मनसेची राज्यातील या एकमेव महापालिकेत सत्ता होती. पक्षांतर्गत वादामुळे मागील निवडणुकीत मनसेला सत्ता गमावावी लागली होती. त्यानंतर राज यांची नाशिकची नाळ तुटली. अपवादात्मक स्थितीत त्यांचा दौरा व्हायचा. माजी आमदार वसंत गितेंसह अनेक पदाधिकारी, २८ नगरसेवक एकापाठोपाठ एक मनसेला सोडून गेले. ४० नगरसेवकांची संख्या अवघ्या पाचवर आली.याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गांभीर्याने विचार करत नाशिकमध्ये पुन्हा संघटना मजबूत करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News