President Election : CAA कायद्याबाबत यशवंत सिन्हा यांचं मोठं वक्तव्य

देशात राष्ट्रपती निवडणूकीची रंगत वाढली आहे. भाजप विरुध्द विरोधी आघाडी एकमेकांसमोर उभी ठाकले आहे. त्यातच मतांच्या जुळवाजुळवीसाठी दोन्ही उमेदवारांच्या पायाला भिंगरी लागलेली आहे. दरम्यान यशवंत सिन्हा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Update: 2022-07-14 03:01 GMT

देशात राष्ट्रपती निवडणूकीमुळे वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. त्यातच भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विरुध्द विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा यांच्यात थेट सामना पहायला मिळणार आहे. दरम्यान दोन्ही उमेदवारांकडून देशातील विविध राज्यांना भेटी दिल्या जात आहेत. यादरम्यान यशवंत सिन्हा आसाम दौऱ्यावर असताना त्यांनी सीएए बाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

यशवंत सिन्हा आसाम दौऱ्यावर असताना विरोधी खासदारांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकार देशात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायद्याची (CAA) अंमलबजावणी कोरोनाचे कारण देत लांबवली आहे. कारण या कायद्याचा मसूदाच कमकुवत आहे. त्यामुळे हा कायदा लागू करता आला नाही, अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली.

आसाममध्ये नागरिकत्व हा प्रमुख मुद्दा आहे. तसेच सीएए कायदा लागू केल्यानंतर त्याचे आसाममध्ये तीव्र पडसाद उमटले होते. मात्र हा कायदा देशभर लागू करण्याचा विचार सरकारचा आहे. त्यापार्श्वभुमीवर यशवंत सिन्हा म्हणाले की, देशाच्या संविधानाला बाहेरील शक्तींमुळे धोका नाही तर सत्तेत असलेल्यांपासून धोका आहे. त्यांमुळे आपण संविधानाचे रक्षण केले पाहिजे. एवढंच नाही तर मी जर राष्ट्रपती झालो तर सीएए कायदा लागू होऊ देणार नाही, असं वक्तव्य केले.

येत्या 24 जुलै रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे 18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजी नवे राष्ट्रपती शपथ घेतील. मात्र मतदानाची तारीख जवळ येत असताना दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रपती निवडणूकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News