मंत्रिमंडळाचा विस्तार मतभेदांमुळे रखडला, जयंत पाटील

Update: 2022-07-26 12:13 GMT

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्याबाबत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहेय. ज्याअर्थी मंत्रिमंडळ विस्तार करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जे लोकं जिवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत, ते लोक तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय गप्प बसतील असं वाटत नाही, त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे असे भाकीतही जयंत पाटील यांनी वर्तवले आहे. राज्यात पुरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहेत.

महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्हया- जिल्हयात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे असेही जयंत पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यापासून अनेक दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत चारवेळा दिल्ली वारी केली असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Tags:    

Similar News