एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackrey ) यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी बंडखोर आमदारांना ठाकरी शैलीत इशारे देण्य़ास सुरूवात केली आहे. रविवारीही मुंबईत (Mumbai) शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी आपल्याला एका मित्राने काही दिवस ठोकरे आडनाव करा असा सल्ला दिल्याचे सांगितले.
बंडखोर आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान आदित्य यांनी दिले. बंड करणाऱ्या आमदारांना आपण पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर एका मित्राने तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा असा सल्ला दिला, पण ठोकरेपेक्षा ठाकरे आडनाव जास्त ताकदवान आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच विधिमंडळात फ्लोअर टेस्ट होईलच आणि त्यात आपण जिंकू असा दावा त्यांनी केला.
पण आमदार येतील तेव्हा विमानतळावरून विधानसभेचा रस्ता कुठून जातो, याचा विचार त्यांनी करावा, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. राज्यात CRPF, सैन्य तैनात करा, रणगाडे आणा पण शिवसैनिक उभा राहिल आणि तुम्हाल बघून घेईल असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. याच बरोबर त्यांनी बंडखोरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्यासमोर नको पण माझ्यासमोर बसुन दाखवावे, असे आव्हान दिले. तसेच त्यावेळी त्यंच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला आम्ही काय कमी केलं, कुणाच्या नावावर तुम्ही निवडून आलात, असा सवाल आपण त्यांना विचारणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.