भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार का? रावसाहेब दानवे म्हणतात....

Update: 2022-06-23 03:23 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या 34 आमदारांनी राज्यपालांना पत्र दिलेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असल्याचं म्हटले आहे, तसेच प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नेमणूक त्यांनी केलेली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी प्रतोद म्हणून काढलेले आदेश बेकायदा आहेत अशीही भूमिका या आमदारांनी मांडलेली आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत नसल्याने सरकार संकटात आले आह असे आता सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे असा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जातो आहे. पण आता यावर भाजपतर्फे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुरतमध्ये राहण्याची सोय करण्यापासून आसाममध्ये नेण्यापर्यंत भाजपनेच सहकार्य केल्याचा आरोप सामनामधून संजय राऊत यांनी केला आहे. या बंडखोर आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असाही आरोप शिवसेना करते आहे. यासर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजप एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नाही, असा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बुधवारी दिवसभर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीतून बाहेर पडताना रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

Similar News