Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई महामार्गावर ‘समृद्ध’ खड्डा, आव्हाडांच्या लेकीचं ट्विट चर्चेत

Update: 2025-06-09 09:11 GMT

बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरु झाली होती. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यावेळी वेगावर नियंत्रण नसणे, चालकाला झोप येणे अशी कारणं प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, आता या मार्गावरील रस्त्यावरच खड्डे पडायला सुरुवात झालीय. त्यामुळं समृद्धी महामार्गाच्या रस्त्यांच्या ‘दर्जा’वरच प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागलंय.

छत्रपती संभाजीनगर इथल्या माळीवाडा इथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळून खड्डा तयार झालाय. पुलाचा स्लॅब कोसळला त्यावेळी सुदैवानं खालच्या रस्त्यावर वाहनं जात नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. समृदधी महामार्गाच्या या पॅकेजचं काम हे मेघा इंजिनिअरिंग (Megha Engineering) या कंपनीनं केलेलं आहे. समृद्धी महामार्गासारख्या बहुचर्चित महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मेघा इंजिनिअरिंग या कंपनीनं तातडीनं या स्लॅबच्या दुरुस्तीचं काम सुरु केलेलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये समृद्धी महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. नागपूर-मुंबई हे अंतर अवघ्या ७ तासात या महामार्गावरुन पार करणं शक्य असल्यानं अनेक नियमांमध्ये सुधारणा करुन हा प्रकल्प पूर्णत्वास आणला गेला. छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या माळीवाडा इथं धुळे-सोलापूर महामार्गाच्या वरच्या बाजूला असलेल्या या समृद्धी महामार्गावरील पुलाचा स्लॅब कोसळल्यानं मोठा खड्डा पडला. या महामार्गावरुन वाहनं वेगानं जात असतात, त्यातच ऐन पुलावरील स्लॅब कोसळल्यानं मोठा खड्डा पडला. मात्र, सुदैवानं त्यावेळी वाहनांची पुलावरही अन् पुलाखालच्या रस्त्यावरही वाहतूक नव्हती, त्यामुळं मोठा अनर्थ टळला.

या दरम्यान पाऊस सुरु झाल्यानं धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली. हजारो कोटी रुपये खर्च करून सामान्यांच्या नशिबी हे समृद्ध खड्डे देणाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार ? हजारो रुपयांचा टोल भरणाऱ्या वाहनचालकांना जर अशाप्रकारच्या दर्जाहीन रस्त्यांवरुन प्रवास करावा लागत असेल तर लोकांनी टोल का भरायचा ?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं MSRDC समृद्धी महामार्गावरील या घटनेची माहिती तातडीनं मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला दिली. आणि कंपनीनं दुरुस्तीचं काम सुरुही केलं. या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्ग प्रकल्पातून महाराष्ट्रातील दोन मोठ्या राजकारण्यांनी अमाप पैसा कमावला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या दोन नेत्यांचा भागीदारी व्यवसाय थांबल्यानं त्यांनी सरकार पाडलं. कारण समृद्धी महामार्गातील या दोन नेत्यांची भागीदारी थांबली होती, त्यामुळं मविआचं सरकार पाडण्याचं हे देखील एक कारण असल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा यांनी केलंय. मात्र, या दोन्ही नेत्यांची नावं घेण्यास आणि समृद्धी महामार्गावरील दुर्घटनांसाठी त्यांना जबाबदार धरण्यास माध्यमं घाबरत असल्याचंही त्या म्हणाल्या.

Tags:    

Similar News