Piyush Goyal's Statement on US-India Trade : भारताला होणार फायदा???

अमेरिका-भारत व्यापार करारामुळे कोणत्या समाज वर्ग घटकांना फायदा होणार का नुकसान होणार? होणार ते किती होणार… आणि ज्यांचे नुकसान होणार त्यांच्यासाठी शासनाच्या काय योजना असणार आहेत? यावर व्यापार/ अर्थ मंत्र्यांनी मांडणी केली पाहिजे. - संजीव चांदोरकर, अर्थतज्ज्ञ

Update: 2026-02-13 09:59 GMT

Impact of US-India Trade Deal on Indian Economy व्यापार मंत्री पियुष गोयल म्हणतात की, अमेरिका भारत व्यापाराचा "भारता"ला फायदा होईल. ही “भारत” नावाची काय एखादी व्यक्ती आहे की काय ?

भारतात एवढी गुंतागुंतीची अर्थव्यवस्था आहे, एवढे समाज अर्थ घटक आहेत की त्यांचे आर्थिक हितसंबंध परस्परांना छेद देणारे आहेत. उदा. निर्यातप्रधान तयार कपडे उद्योग आणि देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी. किंवा महागडे इंपोर्टेड, ब्रँडेड दुग्धजन्य डेअरी प्रॉडक्ट्स विकत घेणारा शहरी / उच्च मध्यम वर्ग आणि देशातील महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी. ही झाली फक्त दोन उदाहरणे. अशी अनेक देता येतील. हे तर होणारच म्हणून गाभ्यातील मुद्दा जमिनीत गाडला जाऊ शकत नाही. व्यापार करारामुळे कोणत्या समाज वर्ग घटकांना फायदा होणार का नुकसान होणार, होणार ते किती होणार… आणि ज्यांचे नुकसान होणार त्यांच्यासाठी शासनाच्या काय योजना असणार आहेत? यावर व्यापार/ अर्थ मंत्र्यांनी मांडणी केली पाहिजे.

ज्या समाज अर्थ घटकांची अर्थ जोखीम क्षमता कमकुवत आहे त्यांच्या किमान उपजीविकांची काळजी घेणे शासनाचे घटनादत्त कर्तव्य आहे. जे कॉर्पोरेट क्षेत्र स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते त्यांना मात्र लाखो कोटी रुपयांची पॅकेजेस फटाफट दिली जातात. मोघम बोलणे, सोयीची तेवढीच आकडेवारी समोर ठेवणे या धोरणकर्त्यांच्या हातातील ढाली आहेत. व्यापार कराराच्या वाटाघाटी करतांना, समांतर पद्धतीने, सबंधित मंत्रालयाने असे होमवर्क करून शासनाने तरतुदी केल्या पाहिजेत. पैशाचे नका सांगू. या वर्षीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प ५३ लाख कोटींचा आहे !

संजीव चांदोरकर (१३ फेब्रुवारी २०२६)

Similar News