नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर राकेश किशोर नावाच्या एका वकिलानं घोषणाबाजी करत जोडा मारुन फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळं काही क्षणासाठी न्यायालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. न्यायालयात उपस्थित सुरक्षा रक्षकांनी वकील राकेश किशोरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सरन्यायाधीश गवईंनी कामकाज सुरुच ठेवण्याचे आदेश दिले.
सोमवारी नियमितपणे सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरु होतं.तेव्हा राकेश किशोर नावाचा हा वकील सरन्यायाधीशांच्या जवळ पोहोचला. त्याने पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावेळी राकेश किशोर हा वकील "सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही" अशा घोषणा देत होता. १६ सप्टेंबर २०२५ रोजी खजुराहो इथल्या भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीच्या पुनर्स्थापनेशी संबंधित खटल्याच्या सुनावणी वेळी सरन्यायाधीश यांनी काढलेले उद्गार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. "तुमची तक्रार असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा", असे सरन्यायाधीश गवई याचिकाकर्त्याला म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आज राकेश किशोर नावाच्या वकिलानं थेट सरन्यायाधीशांवरच हल्ल्याचा प्रयत्न केला. "सनातन का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान" अशा घोषणाही या वकिलानं न्यायालयाच्या आवारात दिल्या.
वकिलाच्या या गोंधळानंतरही सरन्यायाधीश गवईंनी कामकाज सुरुच ठेवलं. ते म्हणाले," हे सर्व पाहून कुणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही".
विष्णु मंदिराशी संबंधित नेमकं प्रकरण काय ?
मध्य प्रदेश इथल्या प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातल्या सात फूट उंच असलेली भगवान विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचं शीर नाहीये. ही शीर नसलेली मूर्ती हटवून त्या ठिकाणी भगवान विष्णूची नवी मूर्ती बसवावी, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं १७ सप्टेंबर रोजी फेटाळली होती. हे काम पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येत असल्याचं कारण सर्वोच्च न्यायालयानं दिलं होतं. यावेळी सरन्यायाधीश गवई याचिकाकर्त्याला म्हणाले होते, " तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडेच प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. कारण ते मंदिर हे पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येतं. पुरातत्व खात्याच्या परवानगी शिवाय तिथं काही करता येणार नाही. तिथं काही करायचं असल्यास त्यास एएसआयची परवानगी घ्यावी लागते.त्यामुळं आम्ही या प्रकरणात दखल घेऊ शकत नाही,याचा खेद वाटत असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं.