APMC बाजारात आंब्याची आवक सुरु

राज्यात अजून थंडी संपायला अवकाश असला तरी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबे यायला सुरवात झाली आहे. तसा आंबा हे फळ उन्हाळा सुरु झाला की, बाजारात दाखल होते. मात्र यंदा आंबा बाजारात फेब्रुवारीच्या १५ तारखेपासून दाखल व्हायला सुरवात झाली आहे.

Update: 2023-02-15 14:49 GMT

नवी मुंबईतील APMC बाजारात आंब्याची आवक वाढली असून, मागील दोन दिवसात जवळपास एक हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. थंडीचा कडाका असल्याने आंब्यावर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता थंडी काही प्रमाणात सरली असल्याने आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. हिच आवक पुढील महिन्यापासून दुप्पट होणार आसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात असून, आता दिवसभरात चारशेपर्यंत पेट्या येत आहेत. हा आकडा पुढील महिन्यात हजारांच्यावर जाणार आहे.

बाजारपेठेत आंब्याच्या गुणवत्तेप्रमाणे पेटीला भाव मिळत आहे. यामध्ये साधारण आंब्याच्या एका पेटीला जास्तीत जास्त दोन हजारांचा दर मिळत असून, हाच उत्तम गुणवत्ता असलेल्या आंब्याच्या एका पेटीला दहा हजारांचा दर मिळत आहे. पुढील महिन्यात आवक वाढल्यास दर कमी होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र ज्या हंगामामध्ये आंबा यायला हवा होता तो आलेला नाही. साधारण एक महिन्याचा उशीर झाला आहे. आता तो आंबा यायला सुरुवात झाली असून, पुढच्या महिन्यात आवक वाढेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. पुन्हा एका महिन्याचा उशीर होऊन मे महिन्यात सुरू होणारी आवक वर्षाच्या शेवटपर्यंत कायम राहील. अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. मात्र आता येणारा आंबा उत्तम असून या आंब्याला खवय्यांची चांगली आणि मोठी मागणी असते. यामुळे व्यापारी आनंदित असून बाजार आंबामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Tags:    

Similar News