#Lakhimpur : योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Update: 2021-10-08 08:31 GMT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri) इथल्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ (yogi adityanath) सरकारने उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उ. प्रदेश सरकारने आतापर्यंत या प्रकरणातील आरोपीला का अटक केली नाही, असा संतप्त सवालही कोर्टाने विचारला आहे. उ. प्रदेश सरकारने आतापर्यंत या प्रकरणात केलेली कारवाई असमाधानकारक आहे, असे कोर्टाने म्हटले आहे.

उ. प्रदेश सरकारची बाजू मांडताना हरिश साळवे (harish salve ) यांनी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा (ajay mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (ashish mishra) याला उद्या ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले आहे. जर तो चौकशीला हजर झाला नाही तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे साळवे यांनी सांगितले आहे. बेदरकारपणे गाडी चालवून शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या आशीष मिश्रा याला शुक्रवारी सकाळी १० वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण तो हजर झाला नाही. एखाद्या व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊनही त्याला अजून ताब्यात का घेतले नाही, इतरही आरोपींच्या बाबतची आपण अशीच प्रक्रिया पार पाडता का, असा खोचक सवालही कोर्टाने यावेळी विचारला. आठ शेतकऱ्यांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे, कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असे न्यायालयाने यावेळी सुनावले.

राज्य सरकारने तयार केलेल्या SIT वरही कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. या SITमध्ये सर्व स्थानिक अधिकारी असल्याचा आक्षेप कोर्टाने नोंदवला. तसेच दुसऱ्या कुठल्याही यंत्रणेकडे तपास सोपवला जाईपर्यंत या घटनेतील सर्व पुरावे सुरक्षित राहतील याची जबाबदारी डीजीपींवर असेल असेही कोर्टाने सांगितले. तसेच सीबीआयकडे तपास सोपवणे सध्या योग्य होणार नाही, असेही मत कोर्टाने व्यक्त केले. दरम्यान सरकारने या प्रकरणाचा तपास कोण करेल याची माहिती देणार असल्याचे आश्वासन दिल्याने पुढील सुनावणी लवकर घेण्याचेही कोर्टाने सांगितले.

Tags:    

Similar News