'...आता हेच लोक खाटीकखान्यात बसून प्रवचने झोडत आहेत' ; शिवसेनेचा नारायण राणेंवर निशाणा

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक ही खून, अपहरण, दहशतवाद यामुळे गाजते. काल संपलेली जिल्हा बँकेची निवडणूकही त्यास अपवाद ठरली नाही." असं म्हणत शिवसेनेनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला

Update: 2022-01-03 03:14 GMT

मुंबई// अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र, यावेळी राणेंनी केलेल्या टीकेवरुन आता शिवसेनेनं नारायण राणेंबरोबरच भाजपावर निशाणा साधलाय.

"सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक ही खून, अपहरण, दहशतवाद यामुळे गाजते. काल संपलेली जिल्हा बँकेची निवडणूकही त्यास अपवाद ठरली नाही." असं शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे या भागातील प्रमुख कार्यकर्ते व निवडणुकीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला. नशीब बलवत्तर म्हणून परब वाचले. या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात आमदार नितेश राणे संशयित आरोपी असून ते फरारी आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. याचा अर्थ असा की, पोलिसांकडे आरोपीविरोधात भक्कम पुरावे आहेत. न्यायालयाने ते मान्य केले.असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली व त्याचे निकालही लागले. निकाल नारायण राणेकृत भाजपाच्या बाजूने लागला. भाजपाच्या सिद्धिविनायक पॅनलने बहुमत मिळविले. शिवसेनेसह महाविकास आघाडीला ८ जागा मिळवता आल्या. म्हणजे निवडणुकीत घासून टक्कर झाली व निसटता पराभव किंवा निसटता विजय झाला. तरीही भाजपाचे 'पॅनल' जिंकले. यास दणदणीत विजयही म्हणता येणार नाही व दारुण पराभवही म्हणता येणार नाही," असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

"राज्यातील ३१ जिल्हा बँकांपैकी ज्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे, त्या-त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने निवडणुका होत आहेत. मात्र, एक सिंधुदुर्ग सोडले तर निवडणुका पार पडलेल्यांपैकी कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. विरोधकांना धमकावणे, अपहरण करणे, खुनी हल्ले करणे विरोधकांच्या बाबतीत अश्लील, असंसदीय भाषेचा वापर करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग वगळता अन्यत्र कुठे झाले नाहीत. साताऱ्यात उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यात जिल्हा बँकेच्या निमित्ताने शाब्दिक जुगलबंदी झाली, पण ती रंगतदार ठरली. सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसते. जे घडते ते रक्तरंजित असते, असा घणाघात शिवसेनेने केला आहे.

श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर हे राजकीय नरबळीच आहेत. हे नरबळी कसे गेले यासाठी केंद्रीय गृहखात्याने एखादी 'एसआयटी' नेमायला हवी.असंही अग्रलेखात म्हटले आहे. बभाजपनेही सिंधुदुर्गात याच दहशती हल्ल्यांचा पुरेपूर स्वाद घेतला आहे, पण आता हेच लोक खाटीकखान्यात बसून प्रवचने झोडत आहेत, असं म्हणत शिवसेनेनं थेट नाव घेता राणेंवर टीका केली.

Tags:    

Similar News