Sanjay Raut : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गच्छंती, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रीया

आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

Update: 2023-02-12 06:08 GMT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडले होते. त्यापार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा (Bhagat singh Koshyari Resign) राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली.

यावेळी संजय राऊत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात राज्यातील जनता, राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी भूमिका घेऊन राज्यपालांच्या विरोधात प्रथमच रस्त्यावर रस्त्यावर उतरले होते. कारण राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केले. महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळाने केलेल्या अनेक शिफारशी नाकारल्या. त्यामुळे राज्याची मागणी ही राज्यपाल बदलासंदर्भात अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना सरकारने तात्काळ हटवायला हवं होतं. पण केंद्र सरकारने हे केलं नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राज्यपाल हे दबावाखाली काम करीत होते. त्यामुळे आता राज्याला बैस हे नवे राज्यपाल मिळाले आहे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. मात्र त्यांचं नाव बैस आहे की बायस हे आगामी काळात समजेल. कारण राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, याचं भान राज्यपालांनी ठेवावं. राजभवनला भाजप कार्यालय बनवू नये, असं मत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News