बुलडाणा : येळगाव धरणातून एकदम येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे येळगाव, सव, किन्होळा, वाडी ब्रम्हपुरी, खूपगाव, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, पेठ, उत्रादा, बोरगाव व परिसरातील शेतीपिकांचे नियमित होणारे नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणातून होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे या मागणीसाठी माजी मंत्री भारत बोंद्रे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांची भेटत घेतली.
येळगाव धरणात लावण्यात आलेले स्वयंचलित गेट पाण्याच्या प्रवाह वाढला तेव्हा एकाच वेळी उघडतात त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पैनगंगा नदीच्या पात्रात येतो. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. सदर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने नदीकाठच्या वरील सर्व गावातील शेतीपिकांचे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे किंवा पावसाचे वातावरण पाहून येळगाव धरणातील पाण्याच्या निचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे होणाऱ्या शेतीपिकांचे नुकसान टळेल, अशी मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.