Maharashtra Bandh : महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४८ ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको

Update: 2021-10-12 02:37 GMT

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'बाबत हा बंद यशस्वी झाला असा दावा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून केला जात आहे तर भाजपकडून हा बंद फसला असा दावा केला जात आहे,दरम्यान या बंदच्या अनुषंगाने राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने व रास्ता रोको करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर मुंबईतही बंदच्या पार्श्वभूमीवर दोन गुन्हे व तीन अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय मुंबईत २०० जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

या बंदच्या पार्श्वभूमीवर जळगावसह एक-दोन ठिकाणे वगळता कुठेही अनुचित प्रकार घडले नाही. या बंदवेळी राज्यात ४८ ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने, रॅली काढण्यात आली. सोलापूरच्या अकलूज टेंभुर्णी मार्गावर टायर जाळल्याचा प्रकार घडला. त्याशिवाय नवी मुंबईत सर्वाधिक म्हणजे पाच गुन्ह्यांची नोंद झाली.

तिकडे कोल्हापूरात गांधीनगर व करवीरनगर येथे दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर मीरा भाईंदर येथील माणिकपूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंद करण्यात आला. मुंबई वगळता राज्यभरात काल सायंकाळपर्यंत आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ३५ हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्या, ७०० सशस्त्र पोलीस दल व ५०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्या माध्यमांतून मुंबईत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विक्रोळी येथे द्रुतगती मार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कांदिवली व समतानगर पोलीस ठाण्यात बंदप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये १४ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags:    

Similar News