आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत आता सामान्य नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर शनिवारी संतप्त नागरिकांनी हल्ला केला. आक्रमक आंदोलक थेट त्यांच्या निवासस्थानात शिरल्याने राष्ट्रपती राजपक्षे यांनी तिथून पळून जाण्याची वेळ आली आहे. ढासळलेल्या आर्थिक स्थितीला राजपक्षे जबाबदार आहेत, असा आरोप करत शनिवारी हजारो आंदोलकांनी राष्ट्रपती भवनला घेराव घातला होता. पोलिसांनी या आंदोलकांना अडवण्यासाठी अश्रूधूर सोडला पण आक्रमक आंदोलक राष्ट्रपती भवनात शिरले.
दुसरीकडे खासदार रजीता सेनारत्ने यांच्याही निवासस्थानावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येते आहे. या हल्ल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दरम्यान आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसखोरी केल्यानंतर झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाले आहेत.
श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक आणीबाणीनंतर जनतेमध्ये राजपक्षेंविरोधात मोठा रोष आहे. यातूनच आंदोलनं पण झाली होती. त्यानंतर सरकारने संचारबंदी लागू केली होती. पण यावरुन राजपक्षे यांच्याविरोधात मोठा असंतोष निर्माण झाल्यानंतर सरकारने शनिवारीच संचारबंदी हटवली होती. दरम्यान आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणेने राजपक्षे यांना आधीच बाहेर काढले होते, अशीही माहिती काही माध्यमांनी दिली आहे.