तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पोलीस म्हणतात आ-त्म-ह-त्या

पालघर जिल्ह्यातील एका युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला असून आपल्या मुलीचा खून झाला असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. काय आहे हा धक्कादायक प्रकार पहा रवींद्र साळवे यांच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये...

Update: 2023-05-28 08:38 GMT

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कापरी येथील बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात एका झाडाला लटकत असल्याचे निदर्शनास आले . या तरुणीने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक अंदाज बांधला जातो आहे. परंतु टक्कल करून आमची मुलगी आत्महत्या कश्यासाठी करेल? असा प्रश्न उपस्थित करत? ही आत्महत्या नसून प्रेम संबंधातून तिचा खून केला असल्याचा आरोप दर्शना धोडी हीची आई वैशाली हिने मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना केला आहे .

दर्शना धोडी( वय 22) वर्ष ही तरुणी आपल्या कुटुंबात समवेत कापरी गावात राहत होती.ती आईसह नजीकच्या फार्म हाऊसवर कामाला जात होती .पण 9 मे रोजी ती कामावरून घरी परतलीच नाही. तिची शोधाशोध केली असता ती सापडली नाही. अखेर सोमवारी 15 तारखेला जंगलात एका झाडाला तिचा मृतदेह लटकत असताना नागरिकांच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर तिचा मृतदेह शविच्छेदनासाठी मुंबईच्याजे जे रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. परंतु या घटनेला10 दिवसाचा कालावधी उलटूनही पोलिसांचा नेहमीप्रमाणे शोध सुरू असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.




 


अत्यंत गरीब परिस्थिती वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा हाकलणारी व वडिलांची भूमिका पारपाडणारी मुलगी गेल्याने मयत दर्शना धोडी हीचे कुटूंब पूर्णतः भयभीत झाले आहे. आमच्या मुलीने आत्महत्या कधीच केली नसती तिची हत्या केली आहे .तसेच या घटनेत पोलीस देखील आम्हाला सहकार्य करत नसल्याचा आरोप या पिडीत कुटुंबीयांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

आम्ही फार्म हाऊस वर कामावर होतो तिला घरी स्वयंपाक व विहिरीवरून पाणी भरण्यासाठी सुट्टीच्या अगोदर लवकर घरी जा असे मी तिला सांगितले. त्यानंतर सुट्टीच्या अगोदर ती घरी आली तिच्यासोबत आमच्या गावातील एक युवक देखील होता असे तिच्या आईने बोलतांना सांगीतले. पुढे त्या म्हणाल्या “मी संध्याकाळी घरी आल्यानंतर पाहिले तर मुलगी घरी आलेली नाही. फोन केला तर फोन उचलत नाहि मला वाटलं की तो सोबत असेल.

त्याच्यासोबत तिचे प्रेम संबंध होते. एकदा तर ती गरोदर देखील राहिली होती आणि ती अधून मधून त्याच्याकडे जाउन राहत असे .यामुळे मी सकाळी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली मात्र त्यांच्याकडे दर्शना आली नसल्याचे त्यांनी सांगीतले .नंतर आम्हाला आमची मुलगी दिसलीच नाही. आणि पाच सहा दिवसांनी तिचा मृतदेहच आम्हाला पाहायला मिळाला. परंतु ही आत्महत्या नाही गणेश खरपडे यांनी तिचा खून केला असल्याचा आरोप मयत दर्शनाच्या आईने केला आहे .तसेच बोलताना पुढे सांगीतले की एक दिवशी गणेश ने आमच्या गावातून रात्री बारा वाजेच्या दरम्यान दुकानातून लिंबू घेऊन गेला होता. तसेच त्यांनी आणून दिलेल्या माझ्या मुलीच्या कपड्यांमध्ये तांदूळ शेंदूर व औषधी वनस्पती देखील आढळून आली यामुळे आमचा दाट संशय आहे की माझ्या मुलीला गावातील त्या युवकानेच खून केला आहे.


 



पोलिसांनी चौकशी करून आरोपीला अटक करावे व माझ्या मुलीला मारणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मयत दर्शनाची आई वैशाली धोडी हिने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर निरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेत मयत दर्शनाचा खून केला असल्याचा कोणताही पुरावा नाही. यामुळे खुनाचा गुन्हा कसा दाखल करणार? तसेच पीडित कुटुंब कुणाच्याही विरोधात तक्रार द्यायला तयार नाहीत तर गुन्हा कसा दाखल करणार ..? तसेच मयताचे टक्कल केले नसून केस गळले होते असे त्यांनी बोलतांना सांगीतले.

या गंभीर घटनेतील तथ्य समोर आणून गुन्हेगारास तातडीने जेरबंद करण्याची मागणी या कुटुंबाने केली आहे.

Tags:    

Similar News