कल्याण : कल्याण शीळ रोडवरील देसाई गावाजवळ एमआयडीसीची 1772 मिमी व्यासाची पाईपलाईन फुटली आहे.या पाईप लाईन मधून नवी मुंबई ,मीरा भाईंदर, ठाणे ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. यावेळी पाण्याचा दाब प्रचंड असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना पाईप लाईन फुटल्याची माहिती मिळताच तातडीने पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला, मात्र तरीही पाईप लाईन मधील पाणी वाहून जाण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला.दुपारी बारा वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम चालेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षात मागील आठ महिन्यात तब्बल सात वेळा पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होण्याबरोबरच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे. ग्रामीण भागात पाण्याचा तुटवडा जाणवत असतानाच दुरुस्तीच्या कामासाठी एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्यामुळे आज नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.