राजस्थानामध्ये चार दलितांना मंत्रिपद देणं हा तर काँग्रेसचा दिखाऊपणा- रामदास आठवले

Update: 2021-11-21 13:18 GMT

मुंबई : राजस्थानमध्ये काँग्रेसने चार दलित नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं आहे. दलितांवर प्रेम आहे म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतलेला नाही, केवळ आगामी निवडणुका पाहून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा आणि भंकपपणा आहे, असा घणाघात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

राजस्थानात अशोक गेहलोत सरकारचा आज विस्तार करण्यात आला. त्यात चार दलित नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यावरून काँग्रेसवर दलित कार्ड खेळत असल्याचा आरोप होत आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसला दलित आणि ओबीसींची आठवण का येते? असा सवाल विरोधकांनी केला आहे. तर दलितांना स्थान देण्याचे काँग्रेसचं धोरण हा केवळ दिखाऊपणा आहे. असं केंद्रीय मंत्री आठवले यांनी म्हटले आहे. दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. त्यामुळेच 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं, असंही त्यांनी म्हटले आहे.

राजस्थान सरकारमध्ये कितीही फेरबदल केला तरी काहीच फरक पडणार नाही. राजस्थानामध्ये भाजपचेच सरकार येईल, असा दावा आठवले यांनी केला. तर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केलं. राज्यात महिला, शेतकरी, आदिवासींना आरक्षण देण्यात आलं आहे. राज्यात दुसऱ्यांदा काँग्रेसचं सरकार येईल, यावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे, असं पायलट म्हणाले. दरम्यान कृषी कायदे मागे घेण्यावरून पायलट यांनी भाजपवर टीका केली. कोणत्याही चर्चेशिवाय तीन कृषी कायदे जबरदस्ती थोपवण्यात आले. हे इतिहासात लिहिलं जाईल. वर्षभर आंदोलन झालं. त्यानंतर राजकीय दबाव वाढल्यामुळे मोदींना माफी मागावी लागली. मात्र, या लोकांना नुकसान भरपाई कोण देणार? असा प्रश्न त्यांनी केला.

Tags:    

Similar News