डोंबिवलीमध्ये असलेल्या पक्षी अभयारण्याला पुन्हा आग लागल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या 3 महिन्यात सहावेळा आग लागण्याचा प्रकार घडला आहे. दरवेळी आग लागली की पक्षीमित्र आणि स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते स्वत: जाऊन आग विझवतात. मात्र वन विभागाचे कर्मचारी फोन करून कळवल्यावरही तिकडे फिरकत नाहीत असा आरोप या भागातील रहिवासी आणि निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे यांनी केला आहे. मॅक्स महाराष्ट्रने 3 महिन्यांपूर्वी या पक्षी अभयारण्याला लागणाऱ्या आगींसंदर्बात सविस्तर बातमी दिली होती. तेव्हा देखील वन अधिकाऱ्यांनी कल्याण आणि अंबरनाथच्या हद्दीचे कारण येत यावर बोलण्यास नकार दिला होता.
दावडी, उंबरली, खोणी या गावांच्यामध्ये शंभर एकरावर हे जंगल आहे. उंबरली गावाच्या गावदेवी मंदिर, दावडी आणि खोणी या प्रत्येक गावात या टेकडीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मात्र गेली 5/6 वर्ष झाली निसर्गप्रेमी, पक्षीतज्ज्ञ आणि पर्यावरण प्रेमी यांनी इथे काम करण्यास सुरुवात केली, तसे हे प्रकाश झोतात येऊ लागले. इथल्या वनस्पती, वेगवेगळी झाडे, प्राणी, पक्षी, फुलपाखरे आणि कीटक यांची विविधता जाणून मुंबई, पुणे आणि इतरही ठिकाणचे पर्यावरण प्रेमी फोटोग्राफर इकडे आकर्षित होऊ लागले आहेत. पण कोणताही वारा-वादळ नसताना इथे अचानक आग लागू नेक झाडे जळून खाक झाली आहेत. तर अनेक पक्षीही होरपळून मेले आहेत.
ज्या समाजकंटकांनी ही आग लावली आहे त्यांना मात्र निसर्गप्रेमींनी आव्हान दिले आहे. तुम्ही जेवढ्या आगी आमच्या जंगलात लावाल त्याच्यापेक्षा जास्त झाडं आम्ही लावू आणि त्यांचे संगोपन करू आणि परत एकदा जंगल पूर्ववत करु असा निर्धार केला आहे.