शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र, ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा

दिल्लीत सुरू झालेले शेतकरी आंदोलन आता देशव्यापी झाले आहे. त्यामुळेच मोदी सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

Update: 2020-12-04 14:11 GMT

केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात आता शेतकरी संघटनांनी आणखी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. एकीकडे केंद्र सरकार सोबत चर्चा सुरू असतानाच आता शेतकरी संघटनांनी आठ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. सिंघू बॉर्डरवर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भारत बंदची घोषणा केली आहे. जोपर्यंत सरकार नवीन कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केलेला आहे. केंद्र सरकार सोबत चर्चेच्या चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि शनिवारी पाचवी फेरी होणार आहे. पण त्याआधीच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आता केंद्र सरकार काय भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस एच एस लखवाल यांनी 5 डिसेंबर रोजी मोदी सरकारचा पुतळा जाळा असं आवाहन केलेला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये आम्ही केंद्र सरकारला हे कायदे रद्द करा असा इशारा दिलेला आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे ऑल इंडिया किसान सभेचे हानान मुल्ला यांनी हे आंदोलन आता अधिक तीव्र करत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर सरकारने हे कायदे मागे घ्यावे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. सध्या दिल्लीच्या अवतीभोवती हजारो शेतकरी या कृषी कायद्याविरोधात एकत्र जमलेले आहेत. दरम्यान गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सकारात्मक चर्चा झाली असून पाच तारखेला यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा देखील व्यक्त केली होती. पण शेतकऱ्यांनी शुक्रवारी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आतापर्यंतच्या चर्चेमधून कोणतीही सकारात्मक बाब घडली नसल्याचे आता स्पष्ट झालेले आहे.



Tags:    

Similar News