Fact Check | जेएनयूच्या विद्यार्थ्यांबाबत रतन टाटा यांचं 'ते' वक्तव्य खरं आहे का?

Update: 2020-02-25 11:57 GMT

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांच्या समूहात नोकरी न देण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाच्या काही पोस्ट्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत.

जे विद्यार्थी देशाप्रति प्रमाणिक राहू शकत नाहीत ते कंपनीबद्दल प्रमाणिक कसे काय राहू शकतात, असा विचार करून टाटांनी हा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात येतोय.

व्हायरल पोस्ट्स

Full View

‘मॅक्स महाराष्ट्र’ने या पोस्ट्ससंदर्भात तथ्यांची पडताळणी केली.

रतन टाटा यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांबाबत खरंच अशी भूमिका घेतली आहे का याबाबत अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टाटा समूहाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलचं १५ फेब्रुवारी २०१६ रोजीचं एक ट्विट आढळलं. ज्यामध्ये एका युझरला उत्तर देताना टाटा समूहाने स्पष्ट केलंय की, रतन टाटा यांनी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

ठळक मुद्दे

व्हायरल पोस्ट्सचा आणखी तपास केल्यावर लक्षात आलं की, या आशयाच्या पोस्ट्स २०१६ पासून व्हायरल आहेत. याच काळात दिल्लीतील जेएनयूचं प्रकरण घडलं होतं. देशाविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली कन्हैय्या कुमार आणि त्यांच्या सहकार्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्याविरोधात देशभरात संतापाची लाट होती. सोशल मीडियावरही जेएनयू समर्थक आणि जेएनयू विरोधक असे दोन गट निर्माण झाले होते. या विरोधातून जेएनयूविषयी गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने अशा पोस्ट्स तयार करून व्हायरल करण्यात आल्या.

काही दिवसांपूर्वी CAA आणि NRC च्या मुद्द्यावरून विरोधाची भूमिका घेतल्यानंतर जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यामुळे या पोस्ट्स पुन्हा एकदा पसरवण्यास सुरूवात झाली.

निष्कर्ष

जेएनयूतील विद्यार्थ्यांना टाटा समूहात नोकरी न देण्याबाबत रतन टाटा यांनी कसलीही घोषणा केलेली नाही. असा दावा करणाऱ्या पोस्ट्स पूर्णतः खोट्या आहेत.

Similar News