BMC Election 2026 : जात, धर्म, प्रांत, भाषेच्या नावावर विवाद नको, विकास हवा - Mumbai Congressची भूमिका स्पष्ट

Update: 2025-12-27 03:49 GMT

BMC Election 2026 आगामी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत Congress काँग्रेस पक्ष 'विवाद नको, विकास हवा' या धोरणावर लढणार असल्याची घोषणा Mumbai मुंबई काँग्रेसने केली आहे. प्रशासक राजवटीत मुंबईकरांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत पक्षाने आरोपपत्र जारी केले असून, लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या तीन वर्षे नऊ महिन्यांपासून मुंबई महापालिकेवर प्रशासकाचे राज्य आहे. लोकप्रतिनिधींच्या अभावात मुंबईकरांना लुटले गेले. "आम्ही पुराव्यांसह आरोपपत्र घेऊन आलो आहोत. प्रशासक राजवटीत काय कामे झाली, याचे पुरावे आम्ही मांडत आहोत," असे त्या म्हणाल्या.

रस्ते, ट्रॅफिक जाम, हवेचे प्रदूषण आणि खड्ड्यांच्या समस्यांवर मुंबई काँग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे. "या माध्यमातून आम्ही सरकारला सांगत आहोत की, देशाच्या आर्थिक राजधानीला वाटाण्याच्या अक्षता लावली गेली. मुंबईकरांवर मोठा अन्याय झाला आहे," असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

यावेळी महापालिका निवडणूक मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर केंद्रित झाली पाहिजे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे. जात, धर्म, प्रांत किंवा भाषेच्या नावावर विवाद निर्माण न करता विकास साधायचा आहे. हा मुंबईकरांचा आवाज मुंबई काँग्रेस बनणार, लवकरच मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यात मुंबईच्या विकासासाठी ठोस योजना मांडल्या जाणार आहेत. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढत असल्याने मुंबईकरांच्या विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्याची पक्षाची रणनीती आहे.

मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, तिच्या बजेटमध्ये मोठी रक्कम विकासकामांसाठी असते. मात्र, प्रशासक राजवटीमुळे पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव निर्माण झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आता मुंबईकर कोणत्या पक्षाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar News