किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल, जरंडेश्वर कारखान्याचाही घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. "आई अंबाबाईचा आशीर्वाद म्हणजे महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा भस्मासुर झाला आहे. त्याचा वध करण्यासाठी आज कोल्हापूरात आलोय," असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. घोटाळेबाजांच्या आव्हानाला घाबरत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी कोल्हापुरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सोमय्या यांचे जंगी स्वागत केले.
दरम्यान कोल्हापूरला जाण्याआधी सोमय्या यांनी सातारा येथे जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. "राज्यातील सहकारी साखर कारखाने मोडीत काढून सत्ताधारी राजकारणी ते कारखाने कवडीमोल भावाने विकत घेऊन स्वतःची संपत्ती करत आहेत. येत्या काळात सातारच्या जरंडेश्वर साखर कारखान्यातला घोटाळा बाहेर काढण्यासाठी मी 5 ऑक्टोबर रोजी जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.