'राज्यपाल हे एक महत्त्वाचे व्यक्ती आहे, त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे' - अजित पवार

Update: 2022-01-02 12:37 GMT

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेतील कथित घोटाळ्याची (BMC Ashray Yojana scam) चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Dycm Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यपाल हे एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, आम्ही सगळेच सतत त्यात लक्ष घालून असतो. अनेक तक्रारी लोकायुक्तांकडे येतात. जर त्यात तथ्य असेल तर वस्तूस्थिती सर्वांच्या समोर येईल. तथ्य नसेल तर लोकांनाही कळेल चुकीच्या पद्धतीने तक्रार करत आहेत असं पवार म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठीच्या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी असलेल्या आश्रय योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी थेट राज्यपालांची भेट घेत तक्रार केली होती. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी मिळून राज्यपालांना लेखी तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी लोकायुक्तांना चौकशीचे निर्देश दिले. हा ठाकरे सरकारसाठी दणका मानला जात आहे. त्यावरून माध्यमांशी बोलताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान, BMC च्या या योजनेत 1 हजार 844 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे.

Tags:    

Similar News