मालाड पूर्वेतील 350 नागरिकांचे स्थलांतर; खबरदारीचा उपाय म्हणून मनपाचा निर्णय
मालाड : अतिवृष्टीचा इशारा मिळताच मनपाने मालाड पूर्व येथील आंबेडकर नगर येथील जवळपास साडेतीनशे लोकांचे शाळेत स्थलांतर केले आहे. आंबेडकर नगर परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी भरले जाते, याच भागात 2019 मध्ये जमीन खचल्याने जवळपास 24 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मनपाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मालाड पूर्व येथील कुरार पोलीस स्टेशनं हद्दीतील जवळ पास 100 झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाचे स्थलातंर करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक वैभव भराडकर यांनी दिली.
दरम्यान सतत होणाऱ्या पावसामुळे परिसरात पाणी भरत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यातच आता घर प्रपंच सोडून शाळेचा आश्रय घ्यावा लागत असल्याने येथील महिला नागरिकांना अश्रू अनावर झाले आहे. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मनपाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.