'कसं काय महाराष्ट्र' या 'मॅक्स महाराष्ट्र'च्या विशेष कार्यक्रमात आम्ही ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्याशी संवाद साधला. गडचिरोली जिल्ह्यातील 'सर्च' फाउंडेशनच्या सुंदर कॅम्पसमध्ये त्यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'ला मुलाखत दिली.
निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे आणि मतदारांनी शुद्धीत राहून मत देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मतदारांना कधी दारु, पैसे, साड्या देऊन बेहोश करण्याचे प्रयत्न केले जातात. मतदार जर दारूच्या नशेत मत देणार असेल तर लोकशाही दारुग्रस्त होईल, म्हणून दारूबंदी महत्वाची असल्याचं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलं.
लोकसभा निवडणुकीच्या काळात आम्ही उमेदवारांना दारू न वापरण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी सर्व उमेदवारांनी चांगला प्रतिसाद दिला. निवडणुकीत दारूचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. आता त्यापुढे जाऊन २८७ ग्रामपंचायतींनी दारूमुक्त निवडणूक होण्यासाठी प्रस्ताव मांडले आहेत. हे या लढ्याचं यश असल्याचं डॉ. बंग म्हणाले.
'मुक्तीपथ' या प्रकल्पाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात चार कलमी कार्यक्रम राबवला जातोय. ज्यामध्ये केवळ व्यसनांपासून दूर राहण्याची जनजागृतीच नाही तर व्यसनमुक्तीसाठी केंद्र उभारून समुपदेशन करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशातली आरोग्यव्यवस्था आणि गांधी जयंतीच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आजच्या काळात गांधीवादाची गरज यावरही डॉ. बंग यांनी सविस्तर भाष्य केलं. पहा संपूर्ण मुलाखत...
https://youtu.be/pjb8St2m9Ro