मानवी शरीरातील इतर घटकाप्रमाणे एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे केस. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस पहातो तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्याबरोबर सर्वप्रथम आपणास त्याचे केस नजरेस पडतात. आपण त्या केसांचे वर्णन देखील काळेभोर, लांबसडक, कुरळे, मुलायम, दाट अशी विशेषण वापरून करतो. चेहरा, वर्ण, उंची या प्रमाणेच केस देखील मानवी सौंदर्याचे अविभाज्य भाग आहे. एखादी लांब केस असलेली मुलगी वाटेत जाताना दिसली तर पाहणाऱ्याच्या तोंडातून काय छान लांब केस आहेत असे उदगार सहज पडतात. केसाचे सौंदर्य हे अगदी पुरातन काळापासून आपल्या ग्रंथामधून मांडलेले दिसून येते. अशा केसांना धार्मिक विधीमध्येसुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या केसांना जावळ म्हणतो. पहिल्यांदाच जेव्हा बाळाचे केस काढले जातात त्यावेळेस आपल्याकडे धार्मिक विधी केला जातो आणि त्या विधीला जावळ काढणे म्हणतात आणि त्यासाठी न्हाव्यांना घरी आमंत्रित केले जाते. त्यांचा आदर सत्कार केला जातो. तर मौजिबंधांमध्ये बटूचे केस कापून फक्त शेंडी ठेवली जाते. तर घरातील वडीलधाऱ्यांच्या मृत्यूनंतर केशवपन केले जाते. कधीकाळी कुटुंबातील तरुण मुलांनी केस वाढवले तर बिघडलेल्या तरुणाचे लक्षण मानले जात असे. मुलाचे केस कपाळावर येणे किंवा केसांचा कोंबडा काढणे हा असंस्कृतपणा मानला जात असे. मात्र आता काळ आणि संकल्पना देखील बदलल्या आहेत. केसाची निगा मोठ्या आवडीने आणि निगुतीने प्रत्येकजण करू लागला आहे.
पूर्वी मुंबईमध्ये साधारण ६०च्या दशकात घरोघरी न्हावी येत असत. पांढरा सदरा आणि धोतर आणि हातामध्ये पत्र्याची किवा अल्युमिनिअमची विशिष्ट पेटी घेऊन ठराविक दिवसानंतर आपल्या ग्राहकाच्या घरी येत. त्या कुटुंबातील पुरुषांचे एकाच दिवशी केस कापत असत. हा संपूर्ण कार्यक्रम घरातील एखाद्या खोलीत किंवा चाळीच्या सामाईक व्हरांड्यामध्ये होत असे. या साठी ठराविक बिदागी त्यांना मिळायची. या न्हाव्यांचं “स्टेटस”फॅमिली डॉक्टर प्रमाणेच असायचा. मुंबईतील परेल येथे ६० वर्षापेक्षा अधिक काळ सलूनसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या किशोर गोसार म्हणाले पूर्वी मुंबईमध्ये २००० पेक्षा जास्त पेटी घेऊन दारोदारी फिरणारे न्हावी होते. या सर्वांचे विभाग आणि ग्राहक ठरलेले असत. ठराविक दिवशी ते आपल्या ग्राहकांकडे जात असत. हे व्यावसायिक बहुतेककरून नाभिक समाजाचे असत आणि हा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवित होते. मुंबईमध्ये आज फक्त दोनशे ते अडीचशे पेटीवाले आहेत. गेली पन्नास वर्षे हेअर कटिंग करणारे आणि दादर मधील “कुमार सलून” चे सुरेश कुमार सांगतात १९६५ मुंबईमध्ये तेव्हा सलून मध्ये केस कापण्याचा दर १.५० पैसे इतका होता तर १९७७ साली तीन रुपये झाला. १९६५ च्या सुमारास जगभरात हिप्पीच प्रस्थ वाढल होत, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटत होते. साहजिकच त्यावेळच्या तरुणांमध्ये हिप्पी तरुणाप्रमाणे केस वाढवत होते. याचा आमच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र १९७४ ला ऋषी कपूरचा “बॉबी” सिनेमा आला आणि पुन्हा एकदा आमच्या व्यवसायाला थोडीफार उभारी मिळाली अशी आठवण सुरेश कुमार सांगताना म्हणाले. सत्तरच्या दशकात डॅनी, अमिताभ बच्चन यांच्या केसांची तरुणांमध्ये क्रेझ होती. अशा एकेकाळच्या पारंपारिक भारतामध्ये “हेयर डिझायनर ” हे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये महत्वाचा घटक बनले आहेत. नाभिक समाजापेक्षा इतर समाजातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येत आहेत. हा एक प्रतिष्ठेचा व्यवसाय झाला आहे असे मुंबईतील एका नामांकित सलूनचे संचालक आणि प्रसिद्ध हेअर डिझायनर विशाल यांनी सांगितले. यावर अधिक माहिती देताना विशाल म्हणाले, १९९१ मध्ये भारताने जागतिकीकरणाची कास धरली. भारतीय मध्यमवर्गीयांकडे पैसे खेळू लागला. खर्च करण्याची क्षमता वाढली.
बाळासाहेब ठाकरेंपासून अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या घरी जाऊन केस कापणारे आणि सुमारे ४० वर्षे या व्यवसायात असलेले “शिवा स्टायलो” या सलोनचे शिवकुमार भंडारी सांगतात, “ कला आणि व्यवसाय याच्या बरोबर सलोन ही एक ग्राहकांसाठी ताणताणावातून काही क्षण मुक्त होण्याचे ठिकाण सुद्धा आहे. गेल्या काही वर्षात भारत सर्व बाबतीत बदलत आहे परंतु युरोप, अमेरिकेत ज्या मोकळ्या मनाने कोणत्याही वयोगटातील माणसे फाशीव करतात ते अजूनतरी भारतात होत नाही. काही शे रुपयात सलोनसाठी लागणारी वस्तू विकत घेणारे आज २५ ते ३० हजार रुपये फक्त एका कात्री साठी मोजतात. या व्यवसायात खऱ्या अर्थाने वैश्विकरण झाले आहे. अनेक जाती धर्माचे तरुण-तरुणी या व्यवसायात मालक म्हणून नव्हे तर काम करत आहेत” हा व्यवसाय उत्तरोतर वाढत जाणार असल्याचे शिवा भंडारी यांनी सांगितले. मुंबईसारख्या शहरात सुद्धा “लॅक्मे” व्यतिरिक्त ओळख नसलेल्या मध्यमवर्गाला लॉरिअल , वेल्ला आदी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स भारतात सहज मिळू लागले. कधी काळी केस कापण्यासाठी फक्त ५ रुपये देणारा भारतीय तरुण वर्ग आज १५० रुपये आनंदाने देतो. मुलींच्या केसाला साधारण चारशे ते पाचशे रुपये सहज मोजतात. मुंबई सारख्या शहरामधून सलून मध्ये केस कापण्याबरोबरच पेडिक्यूर, मॅन्यूकर, हेड मसाज, शेविंग असे अनेक गोष्टी केल्या जातात. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात आता मोठ्या संख्येने तरुण मुली येत आहेत. युनिसेक्स सलून मोठ्या प्रमाणात सुरु होत आहेत.
भारतातील ३८ टक्के महिला महिन्यातून दोनदा तर ६१ टक्के पुरुष महिन्यातून एकदा सलूनला भेट देत असल्याची आकडेवारी सांगते. एकूण ग्राहाकापैकी २५ ते ३५ टक्के ग्राहक १८ ते २५ या वयोगटातील तरुण आहेत. वर्षाला सुमारे ५० हजार कोटीचा उलाढाल करणाऱ्या या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात कुशल कारागिरांची गरज असून वर्षाला लक्षावधी रुपये खर्च करून तरुण या संस्थामधून शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत.
भारतीयांचे केस काळे, जाड, लांब आणि थोडसे नागमोडी असल्याने प्रामुख्याने पाश्चिमात्य देशामध्ये या केसांना प्रचंड मागणी आहे. भारतामधून वर्षाला दोन हजार कोटीचे केस परदेशात निर्यात केले जातात. या केसांपासून गंगावन त्याचबरोबरच टोप बनवले जातात. हे केस गोळा करण्यासाठी भारतातील खेडेगावातून काही मध्यस्थ फिरत असतात आणि गरीब, गरजू स्त्रियाकडून केस विकत घेतात. आजही भारतीय खेडेगावात केसांची निगा राखण्यासाठी पारंपारिक तेल वा तत्सम वापरले जातात त्यामुळे अशा रासायनिक विरहित केसांना प्रचंड मागणी आहे.
भारतातून सुमारे तीन हजार टन केस दरवर्षी निर्यात केले जातात. चेन्नईमध्ये गंगावन बनवणारे दोनशे कारखाने असून नामिबिया सारख्या देशामधून भारतीय गंगावानाला प्रचंड मागणी आहे.
-विकास नाईक