नोटबंदीमुळे साडेबारा हजार कोटी रुपयांचे नुकसान

Update: 2017-07-19 07:29 GMT

राज्यमंत्र्यांचा सरकारला घरचा अहेर

नरेंद्र मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे केवळ सामान्य जनताच त्रस्त झालेली नाही तर राज्य सरकारलाही त्याचा आर्थिक फटका बसल्याची कबुली अखेर राज्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे नोटबंदीचा फायदा होऊन अच्छे दिन य़ेतील, या दाव्यातील फोलपणा अखेर सरकारमधल्याच एका मंत्र्याने उघड करीत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, दहशतवाद्यांची रसद तुटून दहशतवादी कारवाया कमी होतील, देशभरात अच्छे दिन येतील, असा दावा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली. या नोटबंदीमुळे सामान्य जनताच भरडली गेली, अनेक व्यवहार ठप्प झाले. छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. यामुळे जनता त्रस्त झाली असली तरी त्याचे परिवर्तन मतांमध्ये न झाल्याने हा निर्णय चांगलाच असल्याचे जनतेने दाखवून दिल्याची हाकाटी मोदी समर्थकांनी केली.

प्रत्यक्षात प्रत्येकालाचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता, हे आता राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना स्पष्ट केले आहे. नोटबंदीमुळे राज्यातील मुद्रांकाचे आणि नोंदणीचे व्यवहार ठप्प झाल्याने सरकारचे साडेबारा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यभरात अन्य व्यवहारांतही कोट्य़वधींचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Similar News