हिंदू राष्ट्राचा उदय

Update: 2019-05-24 08:40 GMT

देशातील जनतेनं भाजपा आणि मित्रपक्षांना दिलेला कौल अभुतपूर्वच नव्हे स्वप्नवत आहे. गेली सत्तर वर्ष हा देश समाजवादी धर्मनिरपेक्ष तत्वांवर चालणारा देश असल्याचं संविधानात नमुद करण्यात आलंय. मात्र, आता हा देश संविधानासह बदलला जातोय की काय अशी भीती निर्माण झालीय. कारण या देशात हिंदू राष्ट्राचा उद्य होत असल्याचे संकेत मतपेट्यांमधून दिले जाताहेत. राष्ट्रवादाच्या आड हिंदूत्ववाद्यांचं ध्रुवीकरण केलं जात असून त्यासाठी हेतुपुरस्सर धर्माची बीजं रोवली जाताहेत.

विकासाची स्वप्नं दाखवणा-या मोदी सरकारनं गेल्या पाच वर्षांत फारसं काही भव्य दिव्य केलं नाही. मोदी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. सुरूवातीच्या ३ वर्षांत मोदी भक्तांना चढलेला ज्वरही कमी होताना दिसला. अनेक प्रश्न नव्यानं उपस्थित झाले. त्यामुळं मोदी सरकार अडचणीत येईल, असं वाटत असतानाच मोदी यांनी पुन्हा एकदा हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी काही विधानं केली. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी मुस्लिमांमुळं हिंदूंवर अत्याचार होत असल्याचं विधान केलं. तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात आपका अली तो हमारा बजरंग बली असं विधान केलं होतं. त्यानंतर मोदींनी महाराष्ट्रात येवूनही हिंदुत्वाचा पुरस्कार केला. हिंदू मतांचं ध्रुवीकरण करताना गोरक्षणाच्या नावाखाली हिंदूंना हिंसाचाराचा अजेंडाच दिला. त्याचं समर्थनही केलं गेलं. त्यामुळं देशात पुन्हा एकदा हिंदू कार्ड खेळून हा देश हिंदूंचा आहे बिंबवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आणि मतपेट्य़ामधून त्याला मिळालेला प्रतिसाद ही हिंदू राष्ट्राच्या उद्याची लक्षणं मानावी लागतील. मात्र, या देशाच्या विविधतेला आणि एकसंघतेला धर्मनिरपेक्षवादाला हा खूप मोठा धोका असून देशाची ओळखच या निमित्तानं पुसली जाण्याची शक्यता निर्माण झालीय.

Similar News