विपश्यनेच्या माध्यमातून जीवन तणावमुक्त होऊ शकतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Update: 2024-02-05 06:10 GMT

प्राचीन भारताची आणि आधुनिक विज्ञानाची अनोखी देणगी ही विपश्यना असून अलीकडच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीतील ताणतणाव या विपश्यनेमुळे दूर ठेवता येऊ शकतात. अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळय़ांनाच विपश्यनेमुळे आयुष्यातील तणावाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. विपश्यना शिक्षक एस.एन. गोएंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विपश्यना विषयाचे महत्त्व विषद करत उपस्थितांशी संवाद साधला.

एकेकाळी त्याग किंवा संन्यासाचे माध्यम म्हणून विपश्यना किंवा ध्यानधारणा याकडे पाहिले जात होते. मात्र, आजच्या व्यवहारी जगात व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग म्हणून विपश्यनेकडे पाहिले जाते. विपश्यनेमुळे कसे लाभ होतात त्याचे पुरावे आधुनिक विज्ञानाच्या मानकांनुसार सगळय़ा जगासमोर आणण्याची गरज असल्याचे वक्तव्य पंतप्रधानांनी यावेळी केले. आपल्या जीवनात ताण-तणाव आणि त्यामुळे येणारे नैराश्य यांचा प्रत्येकाला अनुभव येत असतो. मात्र विपश्यनेच्या शिकवणीतून या ताण-तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यास मदत होत असते असे यावेळी बोलताना पंतप्रधांनांनी सांगितले.

Tags:    

Similar News