महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक राष्ट्रीय नेते. देवराष्ट्रे (सातारा जिल्हा) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण कराड येथे घेऊन उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए., एल्एल्. बी. झाले. १९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा तीत भाग घेतला. १९३२ साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका त्यांना अमान्य झाली व ते काँग्रेसमध्येच राहिले व १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते त्यामुळे प्रतिसरकारशी त्यांचा तसा फारसा संबंध राहिला नव्हता. १९४६ साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि संसदीय चिटणीस झाले. १९४८ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली व १९५२ च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले. पुढे १९६२–६६ या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, १९६६–७० गृहमंत्री, १९७०–७४ पर्यंत अर्थमंत्री आणि १९७४ पासून परराष्ट्रमंत्री बनले.
रॉय यांची विचारसरणी व महात्मा गांधींची आंदोलने यांकडे यशवंतराव आकर्षित झाले, तरी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आचारविचारांचा त्यांच्यावर खोल ठसा उमटला आहे. नेहरूंप्रमाणे डावीकडे झुकलेला मध्यममार्गी नेता, असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांच्या शासकीय तसेच प्रशासकीय कौशल्याचा व लोकनेतृत्वाचा प्रत्यय द्वैभाशिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आले, तेव्हा आला. त्यांनी अल्पसंख्य बिगरमराठी समाजाचा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आपल्या कर्तबगारीने, कार्यक्षम कारभाराने संपादन केला व मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याने काहीही उलथापालथ होणार नाही, याची वरिष्ठ नेत्यांस खात्री पटविली.
चिनी आक्रमणानंतर संरक्षणखात्यात चैतन्य आणण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडली. १९६७ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा अनेक राज्यांत पराभव झाला. त्यामुळे देशात जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीत त्यांनी गृहखाते खंबीरपणे पण कौशल्याने सांभाळले. अर्थखाते त्यांच्याकडे आले, तेही बांगला देशाचे युद्ध, दुष्काळ वगैरेंमुळे खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत. माजी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे इ. उपाययोजना त्यांच्या कारकीर्दीत झाल्या. चलनवाढीला आळा घालण्याचे कडक उपाय योजण्याच्या धोरणाचा प्रारंभही यशवंतरावांच्या कारकीर्दीत झाला.
कार्यक्षम मंत्री, यशस्वी संसदपटू आणि जनसामान्यात ज्याची मुळे रुजली आहेत, असा उदारमतवादी नेता असे यशवंतरावांचे थोडक्यात वर्णन करता येईल. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते राजकारणात आहेत आणि पंचवीसपेक्षा अधिक काळ अधिकारपदावर त्यांनी काढला आहे. ते उत्तम वक्ते व लेखक आहेत. त्यांची विचारप्रवर्तक भाषणे सह्याद्रीचे वारे (१९६२) व युगांतर (१९७०) या ग्रंथांतून संगृहीत केलेली आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रांत अनेक नव्या उपक्रमांना चालना दिली. हे उपक्रम ज्याप्रमाणे सहकारी साखर कारखानदारीचे आहेत, तसेच जिल्हा परिषदा, भाषा संचालनालय, साहित्य संस्कृति मंडळ वगैरे प्रकारचेही आहेत. त्यांच्याबद्दल परप्रांतीयांना आशा वाटते, तर महाराष्ट्रीयांना ते एक विश्वासाचे ठिकाण आहेत.
१९६९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा ती सावरण्याच्या कामी यशवंतरावांनी आटोकाट प्रयत्न केले. देशात यादवीचे वातावरण न ठेवता समन्वयाचे असावे कारण भारतासारख्या प्रचंड, भिन्न भिन्न जातिधर्मांच्या देशात त्याखेरीज आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होणार नाही, ही यशवंतरावांची धारणा आहे. पुरोगामी विचारांचा ते पाठपुरावा करतात. ते पोथीनिष्ठ नाहीत. नीतिमूल्यांचा पुरस्कार व्यवहारात व्हावा, अशी त्यांची इच्छा व प्रयत्न असतात. झगमगाटापेक्षा संथपणा, सातत्य हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि तेच त्यांचे शक्तिस्थान आहे.
साभार- मराठी विश्वकोश